आपण वाटेला जात नाही आणि गेलो तर पुरता कार्यक्रम करू
खांडेश्वर महादेव मंदिरात जल्लोषात आमदार थोरात यांच्या प्रचाराचा शुभारंभ
मंगळवार ०५ नोव्हेंबर
संगमनेर – यावेळची विधानसभा निवडणूक अनेक कारणांनी गाजत आहे. जनतेचा आशीर्वाद आणि पक्ष नेतृत्वाचा विश्वास या बळावर आपण सर्वोच्च पदावर असताना काही लोक जास्त त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे. मागील अडीच वर्षात त्यांनी तालुक्यातील वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला. चांगली घडी विस्कटित करण्यासाठी प्रयत्न केले, सभा घेतल्या. आता तालुक्यातील जनतेला त्रास देणाऱ्या खबऱ्यांना आणि त्यांच्या मागे असलेल्यांना त्यांची जागा दाखवून द्या. आम्ही कुणाच्या वाटेला जात नाही, आणि गेलो तर पुरता कार्यक्रम करू हे दाखवून देण्याची वेळ आली असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री आणि सलग चार दशके संगमनेरचे नेतृत्व करणारे आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले.
खांडगाव येथील खांडेश्वर मंदिरात सोमवारी थोरात यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, दुर्गाताई तांबे, काँग्रेसच्या अध्यक्ष डॉ. जयश्री थोरात, दूध संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख, काँग्रेसचे शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, शिवसेनेचे माजी शहरप्रमुख अमर कतारी आदींसह तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी व महाविकास आघाडीचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
थोरात म्हणाले, १९७८ पासून खांडेश्वराच्या चरणी नारळ अर्पण करून प्रचाराची सुरुवात करण्याची आपली पद्धत आहे. परमेश्वरासह जनतेचा आशीर्वाद यामुळे सातत्याने मोठे यश मिळाले आहे. राज्यात महाविकास आघाडीला अतिशय चांगले वातावरण आहे.
आपण राज्यात सर्वाधिक काळ मंत्रीपदावर राहिलो. मात्र या पदाला एक महत्व असते. सध्याच्या महसूल मंत्र्यांनी तर या पदाचे स्टेटस (महत्त्व) कमी करून टाकले आहे. तालुक्यातील धांदरफळ येथील घटना अत्यंत दुर्दैवी अशी होती. महिला भगिनीचा अपमान करणारी होती. या सभेनंतर तालुक्यातील महिलांचा उद्रेक झाला आणि त्यांनी तो अनुभवला.
राजकारणात तत्त्वज्ञानावर बोलायला हवं, मात्र खालच्या पातळीचे राजकारण हा तालुका कधीही सहन करत नाही. बेताल वक्तव्य करणारे देशमुख दोशी आहेतच मात्र त्याबरोबरच स्टेजवर बसलेले आणि टाळ्या वाजवून त्या घटनेला समर्थन देणारे सर्वजण या घटनेला जबाबदार आहे.
गेल्या अडीच वर्षाच्या कालावधीत अनेक कार्यकर्त्यांवर खोट्या केसेस टाकल्या गेल्या. दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. गोरगरीब जनतेच्या अन्नात माती कालवण्याचाही प्रयत्न झाला. या सगळ्यांच्या पाठीशी समोर असलेला प्रमुख खबऱ्या आहे, आता त्याला त्याची जागा दाखवा.
ही निवडणूक चांगल्या पद्धतीने सांभाळा, राज्यात सर्वाधिक मताधिक्य देऊन संगमनेर तालुका काँग्रेस मागे उभा आहे, हे संपूर्ण राज्याला दाखवून द्या, असे आवाहन करत संगमनेर तालुका शांत, सुसंस्कृत आहे. आम्ही कुणावर दादागिरी करत नाही. कुणाची दादागिरी सहन करत नाही. आम्ही कुणाच्या वाटेला जात नाही आणि जर वाटेला गेलो तर पुरता कार्यक्रम करू, असा इशाराही त्यांनी दिला.

