संगमनेरच्या प्रचार सभेत सत्ताधाऱ्यांवर घणाघात!
गुरुवार, ७ नोव्हेंबर
संगमनेर – येथे काही लोकांचा असा समज झाला आहे की, त्यांचा जन्म हा राज्य करायला, तुमच्या डोक्यावर बसायला, बँका, साखर कारखाने, लोकांच्या जमिनी, लोकांचे धंदे, दूध डेअरी, सहकार बँका स्वतःच्या खिशात टाकण्यासाठी झाला आहे. मात्र आता तुम्हाला हे ठरवावे लागेल तुमचा जन्म स्वतःला सिद्ध करण्यासाठी झाला की प्रस्थापितांच्या पोरांची मक्तेदारी चालविण्यासाठी, यांच्या सतरंज्या उचलण्यासाठी झाला आहे का? असा सवाल करत हे ठरविण्याची वेळ आता आली आहे. इतके दिवस एकच खानावळ होती आता मात्र आपल्याला स्वतःची खानावळ सुरू करावी लागेल वंचितची खानावळ सुरू करण्याची वेळ आल्याचे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी केले.
संगमनेर विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अजीज वोहरा यांच्यासह जिल्ह्यातील उमेदवारांच्या प्रचारार्थ बुधवारी संगमनेरमध्ये सुजात आंबेडकर यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
व्यासपीठावर वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्त्या उत्कर्ष रूपवते, दिशा शेख, संगमनेरचे उमेदवार अजीज वोहरा, शिर्डीचे उमेदवार राजूभाई शेख, कोपरगावचे उमेदवार शकील चोपदार, श्रीरामपूरचे उमेदवार अण्णासाहेब मोहन, नेवासाचे उमेदवार पोपटराव सरोदे, नगर दक्षिणचे उमेदवार हनीफ शेख राहुरीचे उमेदवार अनिल जाधव उपस्थित होते.
आंबेडकर म्हणाले, संगमनेरमध्ये घराणेशाही सुरू आहे. दुसऱ्याच्या फेकलेल्या भाकरीवर जगायचे नसेल तर आपलाच वाढपी आणि आपलंच ताट आपल्याला निर्माण कराव लागेल. म्हणजेच स्वतःच्या हक्काच्या मालकीची एक सत्ता उभी करावी लागेल, त्यासाठी आपल्या हक्काच्या माणसांना मतदान करा.
जिल्ह्यात, तालुक्यात कुठेही पाणी साफ करण्याचा एसटीपी प्लांट उभा करता आला असता मात्र प्रस्थापितांचा हट्ट होता की हा केमिकलचा प्लांट फक्त मुसलमानांच्या वस्तीमध्ये बसेल. आयुष्यभर आपण यांना मते दिली बदल्यात आपल्याला काय मिळाले असा सवाल करत या प्लांट विरोधात अजीज वोहरा यांनी आवाज उठवला.
विधानसभेमध्ये वंचित बहुजन आघाडीने अल्पसंख्यांक संरक्षण आणि हेट स्पीच विरोधात मोहम्मद पैगंबर नावाचे बिल ठेवले होते. वंचितच्या आमदाराच्या माध्यमातून हे बिल पुन्हा सभागृहात आणून मंजूर केले जाईल. सभागृहात हे बिल पास झाले असते तर त्या दीड फुट्याची, गिरीराज महाराज, कालीचरण महाराज यांची काहीही बोलण्याची हिंमत झाली नसती. राहुरीमध्ये हिंदुत्ववादी संघटनांच्या सभेत भाषण करताना दीड फुट्या राणे याने मुस्लिमांच्या विरोधात भाष्य केले त्यानंतर राज्यभर त्याचे पडसाद दिसू लागले. टिपू सुलतानची प्रतिमा दिली तरी पोलीस घरातून उचलून नेत होते. मात्र बाळासाहेब आंबेडकर यांनी अफजल खानाच्या कबरीवर सादर चढविल्यानंतर हे प्रकरण थांबले असल्याचे ते म्हणाले.
लोकसभेत भाजपाला हरविण्यासाठी इंडिया अलायन्स ठरलं होतं. राज्यात इंडिया अलायन्सचे उमेदवार मोठ्या संख्येने निवडून आले. मात्र एससी एसटी ॲक्ट, क्रिमिलियरचा, वक्फ बोर्डचा मुद्दा समोर आला तेव्हा यातील एकानेही आवाज उठविला नाही. त्यामुळे आज वंचित हाच सर्वांसमोर एकमेव पर्याय आहे.
उत्कर्षा रूपवते म्हणाल्या, वंचितने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. प्रत्येक मतदाराने मतदानापूर्वी तो वाचायलाच हवा. वंचित घटकातील माणसांना, कार्यकर्त्यांना उमेदवारी, प्रतिनिधित्व देणारा हा एकमेव पक्ष आहे. ओबीसी मराठा आरक्षणाचा वाद राज्यात पेटला असून मराठा आरक्षणाभोवती निवडणूक फिरत आहे. गरजवंत मराठ्यांना आरक्षण मिळायलाच हवे, पण ओबीसी आणि मराठा यांच्या आरक्षणाचे ताट वेगळे हवे. त्यांना हक्काचे आरक्षण मिळायला हवं ही वंचितची भूमिका आहे.
वंचितची सत्ता आली तर मोहम्मद पैगंबर बिल १००% पूर्ण करणार. वंचित दुर्लक्षित ग्रामीण गरिबांचे शिक्षण संपविण्याचा घाट घातला गेला आहे. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी राज्यात लागू होऊ दिली जाणार नाही. भटक्या विमुक्तांचे नेतृत्व वंचितच्या माध्यमातून उभे राहत आहे.
ज्यांनी पक्ष बनवला त्यांचाच पक्ष चिन्ह फोडून हे लोक सत्तेवर येतात अशा प्रकारच राजकारण महाराष्ट्राने कधी बघितले नाही. यांना सत्तेतून दूर करायला हवे. महायुती, महाविकास आघाडीत जागांवरून भांडण सुरू असताना २०० उमेदवार वंचित बहुजन आघाडीने स्वबळावर दिले आहेत. राज्याच्या इतिहासात एवढ्या मोठ्या संख्येने उमेदवार देणारा एकमेव पक्ष वंचित ठरला आहे.
दिशा शेख म्हणाल्या, काँग्रेसने आतापर्यंत विधानसभेला या गावात एकही मुस्लिम उमेदवार दिला नाही. आपण लोकशाहीमध्ये आहोत राजेशाहीमध्ये नाही. मात्र तुम्ही आजही गुलामी करीत आहात. नगर जिल्ह्यात सहकारी साखर कारखानदारी उभी राहिली मात्र ही कारखानदारी बंद पाडत स्वतःचे खाजगी कारखाने कोणी सुरू केले असा सवाल केला. साखरेच्या शेतीतील आमदार, खासदार बुजगावणे आहेत. एक बाळासाहेब स्वतःच्या मुलीला आमदार बनवू इच्छितो तर दुसरे बाळासाहेब तुमच्या मुलाला आमदार बनविण्यासाठी निघाले आहे. तुम्ही कोणाला निवडणार, असा सवाल उपस्थित केला.
७५ वर्षांमध्ये तृतीयपंथीयाला कोणीही उमेदवारी दिली नाही. एकट्या बाळासाहेब आंबेडकरांनी रावेर मतदार संघातून तृतीय पंथीयाला उमेदवारी दिली. या व्यासपीठावरून एक तृतीयपंथीय मोठ्या नेत्यांना चॅलेंज करते ही केवळ आंबेडकरांची किमया असल्याचे त्यांनी सांगितले.

