गुरुवार, ०६ नोव्हेंबर
संगमनेर – तुमचा आत्मविश्वास गेला आहे, तुम्ही भाषणाला घाबरू लागलात त्यामुळे आता आमच्या सभांमध्ये जॅमर बसविले जाऊ लागले आहे. लोकांना म्हणणं देखील ऐकू द्यायचं नाही, नाहीतरी आम्ही तुमच्या एवढे वाईट बोलत नाही, का घाबरताय तुम्ही? अशा झोंबणाऱ्या शब्दात राज्याचे माजी मंत्री, काँग्रेसचे विधिमंडळ पक्ष नेते बाळासाहेब थोरात यांनी विखे पिता-पुत्रांवर टीका केली.
शिर्डी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रभावती घोगरे यांच्या प्रचारार्थ आश्वी खुर्द येथील सभेत थोरात बोलत होते. डॉ. जयश्री थोरात, प्रभावती घोगरे, शिवसेनेचे सचिन कोते, बाळासाहेब गायकवाड, सचिन चौगुले, सोनल जगताप, प्रतिभा जोंधळे, ॲड. रामदास शेजुळ आदींसह महाविकास आघाडीचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.
शिर्डी मतदार संघाशी आमचा काय संबंध असे विचारणाऱ्या विखे पिता पुत्रांना टोला लगावतांना थोरात म्हणाले, मी शिर्डी मतदार संघाचा मतदार असून संगमनेरचा ज्या पद्धतीने विकास केला, ज्या पद्धतीचे राजकारणाचे वातावरण संगमनेरमध्ये आहे ते या मतदारसंघांमध्ये सुद्धा आणण्याचा माझा अधिकार आहे. एका व्यासपीठावर येऊन जनसमुदायासमोर आम्ही संगमनेरमध्ये केलेले काम आणि तुम्ही राहता-शिर्डीमध्ये केलेले काम याची एकदा प्रत्येक मुद्द्यावर तुलनाच होऊन जाऊ द्या, मात्र गडी यावर बोलायला तयार नाही. 
‘दहशत से आजादी’ हा कार्यक्रम घेऊन सचिन चौगुले, सचिन कोते या मतदारसंघासाठी एक ऐतिहासिक काम करत आहे. दहशतीचे वातावरण, सुडाच राजकारण मतदार संघात निर्माण करणार असाल तर तुम्हाला लोकप्रतिनिधी म्हणून राहण्याचा अधिकार नाही, हे लक्षात ठेवा. पिण्याच्या पाण्यातही हे लोक राजकारण करत आहे. निवडणुकीत निरनिराळे आमिष घेऊन ते तुमच्याकडे येतील मात्र आमिषाला बळी पडू नका. निवडणूक आयोगाने देखील सर्वांना हेच सांगितले आहे.
खोट्या केसेस करणे, माणसं जेलमध्ये घालावयाचे काम सुरू आहे. हे लोक एवढे बारीक झाले की माझ्या पीएलादेखील प्रसिद्धी देऊ लागले आहे. फसलेल्या वाळू धोरणाबद्दल माझ्या एकाही प्रश्नाला सभागृहात ते उत्तर देऊ शकले नाही. तलाठी भरती बद्दल भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी आहे मात्र त्याची शहानिशा अद्यापही होत नाही.
मागील साठ वर्ष खासदार, आमदार, मंत्री, जिल्हा परिषद अशी विविध पदे तुमच्याकडे होती. मात्र तरीही तुम्हाला साधी एमआयडीसी करता आली नाही. मृत्यूचा सापळा असलेला नगर-मनमाड रस्ताही तुमच्या सत्ता काळात करता आला नसल्याची टीका थोरात यांनी केली. 
प्रभावती घोगरे म्हणाल्या, निवडणुका आल्या की सत्ताधारी अगदी डांबरी रस्त्यावर सुद्धा मुरूम टाकतात. कुटील आणि कारस्थाने करणारे असे विखे घराणे आहे. आमदार थोरात यांचे नाव सर्वत्र आदराने घेतले जाते. महाविकास आघाडीची समन्वयाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. मी साधी गृहिणी असून राहता तालुक्यातील दहशतवाद संपवण्यासाठी मी जनतेच्या पाठबळावर उभी असल्याने मला पण साथ द्या.
जयश्री थोरात म्हणाल्या, मी न्याय मागायला गेले आणि माझ्यावरच केसेस टाकल्या. जे माझ्या पाठीशी उभे राहिले त्यांच्यावर हाफ मर्डरच्या केसेस टाकल्या. हा कुठला सत्तेचा गैरवापर आहे. सत्ता येते आणि जाते मात्र जनता आपली असते. २८ गावे जसे आमदार निवडून आणू शकतात तसे आमदार पाडू शकतात. यावेळेस दहशत मुक्तीसाठी घोगरे यांच्या पाठीशी उभे रहा.

