शनिवार, ९ नोव्हेंबर
अहिल्यानगर – लोकसभा निवडणुकीपासून माझे ग्रहमान काही ठीक नाहीत, माझं कुठे काही शिजायला लागलं की कुणीतरी पातेल्याला लाथ मारतंय असं सध्या सुरू आहे. संगमनेरमध्येदेखील माझ्या बाबतीत असंच घडल्याची जाहीर कबुली देत वसंत देशमुखांनी शिजलेल्या पातेल्याला लाथ मारली. धांदरफळमधील त्या सभेमुळे आपली संगमनेरमधील संधी हुकली असल्याची कबुली माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी दिली.
राहुरी विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे (भाजप) उमेदवार शिवाजी कर्डीले यांच्या प्रचारार्थ शिराळ चिंचोडी येथील जाहीर सभेत सुजय विखे यांनी जोरदार भाषण केले. आपल्या भाषणात त्यांनी महाविकास आघाडीवर सडकून टीका केली.
विखे म्हणाले, माझं कुठे काही शिजायला लागलं की कुणीतरी पातेल्याला लाथ मारतंय. संगमनेरमध्ये देखील आपल्या सभांना गर्दी पाहून सर्वांना वाटलं की मी आमदार होणार. तशी चर्चा सुरू झाली. मात्र वसंत देशमुखांनी शिजलेल्या पातेल्याला लाथ मारली, असं सांगत सुजय विखेंनी संगमनेर येथील सभेदरम्यान झालेल्या गोंधळाची आठवण काढत टोलेबाजी केली. 
जिल्ह्यात थोरात आणि विखे या दोन्ही बड्या घराण्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. संगमनेर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात तर शिर्डी विधानसभा मतदारसंघातून राधाकृष्ण विखे पाटील निवडणूक लढवत आहेत. विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे यांनी तिकीट मिळवण्यासाठी बराच खटाटोप केला, मात्र त्यांना संधी देण्यात आली नाही. यावरच सुजय विखे यांनी शिराळ चिंचोडीच्या जाहीर सभेत भाष्य केलंय. काही शिजायला लागलं की कुणीतरी पातेल्याला लाथ मारतंय, माझं काही लोकांसाठी ठीक दिसत नाही. मला बोलावू नका, तुमचं चांगलं चाललंय ते चालू द्या. असं असलं तरी झालं ते झालं आपण काय थकलेलो नाहीत. आपण पुन्हा जोमाने काम करू, असं म्हणत सुजय विखे यांनी आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याचेही संकेत दिले आहेत.
नेमकं काय घडलं होतं धांदरफळच्या सभेत…
सुजय विखे यांनी या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्याविरोधात निवडणूक लढवण्याची तयारी चालू केली होती. लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून ते आमदार होण्यासाठी प्रयत्न करत होते. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी संगमनेर तालुक्यात जिल्हा परिषद गटांमध्ये सभांचा धडाका सुरू केला होता. या सभांना मोठा प्रतिसाद देखील मिळत होता. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील धांदरफळ येथे एका विराट सभेचे आयोजन केले होते. मात्र या सभेत विखे समर्थक असलेले भाजप नेते वसंत देशमुख यांनी बाळासाहेब थोरात यांची कन्या जयश्री थोरात यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. देशमुख यांच्या विधानामुळे संपूर्ण महाराष्ट्रात मोठा गहजब उडाला होता. त्यानंतरची स्थिती लक्षात घेता विखे यांना संगमनेरमधून तिकीट मिळालं नाही. ही जागा शिवसेनेला सोडावी लागली आणि या जागेवर विखे समर्थक असलेले अमोल खताळ यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे थोरात यांच्यासाठी ही निवडणूक सोपी झाल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.

