
राज्यात सुरू असलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजप प्रणित महायुतीचा पराभव झालाच तर त्याला युतीतील नेत्यांची विकृतीच कारणीभूत असेल, असं आता मानायला हरकत नाही. एकदा ठेच लागली की माणूस जागा होतो. पण भाजपचे नेते काही केल्या जागे होत नाहीत, याचं आश्चर्य वाटतं. लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यावरही ज्यांच्यामुळे आपण हरलो त्यांच्याच खांद्यावर विधानसभेच्या प्रचाराची जबाबदारी टाकून भाजपने स्वत:च्याच पायावर मारून घेतलं आहे. नेते किती वाह्यात असावेत याचं प्रत्यंतर राज्यातील प्रचारात होत असलेल्या टीका-टिपण्णीवरून येतं. निवडणुकीत जय-पराजय हा ठरलेलाच असतो. त्याला कोणी पारखं राहिलेलं नाही. पण म्हणून दुसर्यावर कशीही टीका करता येत नाही. दोनच दिवसांपूर्वी जपानमधील इदोगावा शहराचे तत्कालीन आमदार प्रशांत पुराणिक यांची भेट झाली. तिथली निवडणूक प्रक्रिया जाणून घेतली. आपला आयोग अशी प्रक्रिया राबवू लागला तर भाजपचा एकही नेता रस्त्यावर येऊ शकला नसता. आपला निवडणूक आयोग आणि जपानचा निवडणूक आयोग यातील फरक त्यांनी एका शब्दात सांगितला आणि अशा एकाही उमेदवाराची उमेदवारी टिकली नसती, असं पुणारिक यांनी सांगून टाकलं. खरं तर भारतीय लोकशाहीला हा कलंक आहे. जगात मुरलेली आणि रुजलेली लोकशाही ज्या भारतात आहे त्या भारताचा निवडणूक आयोग इतका एकांगी आणि बिनडोक असावा याचं अजब वाटतं.
विषय आहे तो निवडणुकीच्या प्रचारातील भाजपतल्या टीकाकारांचा. आपल्या वायफळ टीकेमुळे पक्षाची हानी होते आहे, याची या नेत्यांना जराही पडलेली दिसत नाही. लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी राज्यात येऊन तोडलेल्या तार्यांनी त्यांना चांगलीच शिक्षा दिली. ४८ पैकी ४२ जागा जिंकण्याचे मनसुबे त्यांना असे गुंडाळावे लागले. त्या पक्षाला केवळ ९ जागांवर समाधान मानावं लागलं. महाविकास आघाडीला आठ जागा मिळाल्या तरी आपण राजकारणाचा सन्यास घेऊ असा पण करणार्या मुंबई भाजपचे अध्यक्ष अशिष शेलार यांचा अहंकार त्यांच्या चांगलाच अंगलट आला. सन्यासाची भाषा ते कुठल्याकुठे विसरून गेले. हातच्या १४ जागा जाऊनही हे नेते शहाणं होण्याचं नाव घेत नाहीएत.
लोकसभेच्या प्रचारात मोदींनी शरद पवारांना भटकती आत्मा म्हणून हिणवलं आणि बाळासाहेबांचे अनौरस पुत्र संबोधत उध्दव ठाकरेंवरील टीकेची खालची पातळी गाठली. त्याचे परिणाम महाराष्ट्राने पाहिले. मोदींच्या ज्या ज्या ठिकाणी सभा झाल्या तिथले बहुतांश उमेदवार पराभूत झाले. मोदींच्या करिष्म्याची ही उलटी गणती म्हणता येईल. यामुळेच आता मोदी नसले तरी चालेल, अशी सबुरीची भाषा भाजपचे उमेदवार वापरत आहेत. पण हे सांगणार कोण कोणाला? आपला नेताच असा वायफळ बोलतो म्हटल्यावर इतरांना स्फुरण येतं. तेही वाह्यात बोलू लागतात. महाराष्ट्रात सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीत हेच पहायला मिळत आहे.
राहुल गांधी यांनी नागपूरमध्ये आयोजित संविधान सभेत लाल वेष्टनातील संविधानाची प्रत जनतेला दाखवली म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी कोण आकांडतांडव केला. फडणवीस यांना उठसूठ शहरी नक्षलवाद्यांची स्वप्न पडतात.
आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात एल्गार परिषदेचं निमित्त करत आठ उच्च शिक्षित विचारवंतांवर शहरी नक्षलवादाचा आरोप ठेवला. त्यांना जवळपास पाच वर्ष तुरुंगवास घडवला. हालचाल थांबलेल्या प्राध्यापक साईबाबांना हे सहन झालं नाही. तुरुंगातील अव्यवस्थेने त्यांचा बळी घेतला. जामीन मिळाला आणि काही दिवसात त्यांचा मृत्यू झाला. राहुल यांनी दाखवलेल्या संविधान प्रतिचा दाखला देत फडणवीस यांनी राहुल यांच्यावर शहरी नक्षलीचा शिक्का मारण्याचा प्रयत्न केला. एखाद्या पुस्तकाचं कव्हर लाल रंगाचं आहे म्हणून त्याला नक्षल संबोधणं हे कसलं लक्षण? राज्याच्या विधानसभेतील कार्पेट हे लाल रंगाचं आहे, म्हणून तिथे सगळे नक्षल वावरतात काय? राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत डाव्या विचारसरणीच्या १८० संघटनांनी सहभाग घेतला होता, असा आरोप करणार्या फडणवीस यांच्या एकूणच हेतू विषयी शंका येऊ लागली आहे. आपण काय टीका करतो, याचं भान त्यांना नाही.
अजित पवारांनी तर दिवंगत आर. आर. पाटील यांच्यावर टीका करताना सिंचन घोटाळ्यातील चौकशीच्या फाईलवर सही केल्याचा आरोप केला. ही फाईल फडणवीस यांनी आपल्याला दाखवल्याचं दादा म्हणाले. आर. आर. पाटील हे कसे राजकारणी होते, हे सार्या महाराष्ट्राला ठावूक आहे. त्यांच्याविषयी आरोप करण्याचे धारिष्ठ्य पवार यांनी कसं काय केलं, याचं कोडंच आहे. याचे साक्षीदार म्हणून ज्या फडणवीस यांचं नाव घेतलं त्यांनीही संविधानिक शपथेचीही बूज ठेवली नाही. 
राज्यावरील कर्ज ९ लाख कोटींच्या घरात पोहोचल्यावर त्या तुलनेत झालेला विकास अगदीच नगण्य आहे, हे सांगायचं काम विरोधक करणारच. त्यांनी तो केला आणि राज्याचा चेहरा मोहरा बदलणार असं शरद पवार यांनी सांगितलं तर सदा खोत यांना इतकं तापायचं कारण नव्हतं. भाजपचे स्टार प्रचारक असलेल्या खोत यांनी आपली प्रचारकीची लायकी दाखवली आणि शरद पवार यांच्या व्यंगावर घसरले. स्टार प्रचारक बनवण्याची कोणती कला खोत यांच्याकडे आहे, हे आज जनतेला कळलं असेल. वायफळ बोलायचं, एखाद्याचा घालून पाडून उध्दार करायचा या कला खोतांच्या नावावर याआधीच जमा आहेत.
पवारांवर त्यांनी यापूर्वीही टीका केली. पण त्या टीकेला कोणी गांभीर्याने घेतलं नाही. पण जेव्हा व्यंगाची भाषा खोत बोलू लागले तेव्हा सर्वांनीच त्यांचं मुस्कट पेटवलं. राज्यातल्या लाखो नागरिकांनी खोतांना शाब्दिक जोडे हाणले. तेव्हा माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला असली मखलाशी खोत करू लागले. आपण किती विद्वान आहोत हे दाखवण्यासाठी ही माणसं असं काहीबाही बोलून जातात आणि स्वत:सह आपल्या पक्षाला अडचणीत आणतात. तरीही तीच माणसं फडणवीसांना जवळची वाटतात. भाजपच्या नेत्यांनी आपलं काम हलकं करण्यासाठीच जणू त्यांची नेमणूक केलेली असावी.
खरं तर एका मुर्खाच्या मागे इतरांनी लागू नये, असं म्हणतात. खोत यांना अनुल्लेखाने सोडायला हवं होतं. स्वत: पवार तर एका शब्दानेही बोलले नाहीत. ना सुप्रिया सुळे बोलल्या. पण आवश्यकता नसताना संजय राऊत यांनी उत्तर दिलं आणि हम भी कुछ कम नही, हे दाखवून देत प्रचाराचा स्तर अधीकच खाली आणला. राऊत यांनी खोताना देवेंद्र फडणवीस यांचा पाळीव कुत्रा संबोधलं. एका अतिरेक्यावर दुसर्या अतिरेक्याने केलेला हा हल्लाच म्हणावा. पुढे खोतांनी राऊत यांना गटारातील डुक्कर गणलं. दोघांच्या भांडणात आपण किती शहाणे आहोत हे दाखवणार्यांची भाजपमध्ये कमी नाही.
राणे पुत्र नितेश राणे यांनी मग आपल्या रितीरिवाजा प्रमाणे या वादात तोंड घातलं आणि राऊत यांना विषारी सापाची उपमा दिली. विषारी साप हा कायम पलटतो, डसतो असं सांगणार्या नितेश यांच्यामुळे पक्षाची झालेली हानी कायम चर्चेत असते. मात्र सत्तेचा अहंकार हा राणे कुटुंबाला कधी सुटलेला नाही. त्याचंच प्रत्यंतर म्हणजे या वादात नितेश यांनी उडी घेणं होय. चिखलात दगड भिरकावून नितेश यांनी स्वत:च्या अंगावर चिखल उडवून घेतलं.
शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी भाजपच्या उमेदवार शायना एनसी यांच्यावर टीका करताना ‘माल’ या शब्दाचा वापर केला. एका महिलेविषयी असलेली मानसिकता कोणत्या थराची असते, त्याचं हे उदाहरण. खरं तर सावंत हे स्वत:ला शहाणे समजत असतील तर त्यांनी असल्या टीकेचा आसरा घेता नये. विरोधकांनी केलेल्या टीकेचा भाजपचे नेते कसा अर्थ लावतात हे सगळ्यांनाच ठावूक आहे. अशावेळी आपण काय बोलतो, याकडे नेत्याचं लक्ष असायला हवं. अन्यथा दिलगिरी व्यक्त करण्याची वेळ ओढावते.
विक्रोळी मतदारसंघात संजय राऊत यांचे बंधू सुनील हे उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार आहेत. त्यांची लढत ही शिंदें सेनेच्या सुवर्णा करंजे यांच्याशी होत आहे. एका बकरीला माझ्या गळ्यात बांधल्याचं वक्तव्यं सुनील राऊत यांनी केलं आणि निवडणूक आयोगाच्या कारवाईला वाट करून दिली. तिकडे संगमनेरमध्ये बाळासाहेबांच्या कन्येला उद्देशून वाह्यात टोमणेबाजी करण्याचे परिणाम भाजपच्या नेत्यांना ठावूक नसावेत. तरीही पोलिसांनी एकांगी भूमिका घेतल्याचा आरोप झाला. महाराष्ट्रात हे खूप चांगलं सुरू आहे, असं सत्ताधार्यांना वाटत असेल तर त्याला कोण काय करणार?
(लेखकाशी संपर्क – ८१६९१३५२५३)

