सोमवार, ११ नोव्हेंबर
संगमनेर – मोहसीन शेख
राज्यात विविध समाज त्यांच्या हक्कासाठी वाटत असताना मुस्लिम समाजाने देखील निवडणूक आपल्या स्वाभिमानाची असल्याची जाणीव ठेवत वंचित बहुजन आघाडीच्या मागे उभे राहण्याची आवश्यकता आहे. समाजाचे प्रश्न सोडविण्याचे ताकद वंचित चे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यात आहे. त्यांची ताकद वाढविण्यासाठी संगमनेर मधून मुस्लिम समाजाने वंचितला मतदान करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अब्दुल अजीज वोहरा यांनी केले.
राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी प्रमुख उमेदवारांच्या प्रचाराने वेग पकडला आहे. संगमनेर विधानसभा मतदारसंघात प्रस्थापिताविरोधात वंचित बहुजन आघाडीने अब्दुल अजीज वोहरा यांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघात सुरुवातीलाच वोहरा यांची उमेदवारी जाहीर झाल्याने त्यांना प्रचारासाठी मोठा अवधी मिळाला.
वोहरा वेगवेगळ्या माध्यमातून मतदारांशी संपर्क साधत आहे. गावागावात जाऊन छोट्या छोट्या कॉर्नर सभा, त्यांच्या या सभांना मिळणारा प्रतिसाद त्यांच्यासाठी निर्णायक ठरू लागला आहे. या सभांच्या माध्यमातून वोहरा मतदारांपर्यंत वंचितसह स्वतःची भूमिका पोहोचविण्यात यशस्वी ठरले आहे.
मुस्लिम बहुल भागात झालेल्या एका छोट्या कॉर्नर प्रचार सभेत बोलताना ते म्हणाले, मुस्लिम समाजाचे राजकीय लढाई सद्य परिस्थितीत ही विकासाची नसून स्वाभिमानाची, मान सन्मानाची आहे हे प्रत्येक मुस्लिम मतदाराने लक्षात ठेवणे आवश्यक आहे. आतापर्यंत ज्यांना आपण मतदान करत आलो त्यांना तुमच्या मताची किती किंमत आहे, हे शहरातील विविध घटनांवरून लक्षात येईल.
त्यामुळे येणाऱ्या काळात जी व्यक्ती आपल्या मतांचा सन्मान करू शकेल अशा व्यक्तीच्याच पर्यायाने वंचित बहुजन आघाडीला तुम्ही साथ देण्याची आवश्यकता आहे. वंचित बहुजन आघाडी तुमच्या पाठीशी सातत्याने उभी राहील. शहर व तालुक्यातील मुस्लिम समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी वंचित बहुजन आघाडी हाच एकमेव पर्याय आपल्यासमोर आहे. त्यामुळे मतदान करताना समोर किती प्रतिस्पर्धी बलाढ्य आहे याकडे लक्ष न देता आपल्यासाठी उभ्या राहणाऱ्या माझ्यासारख्या सामान्य उमेदवाराच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
संगमनेर विधानसभेत वंचितच्या उमेदवाराने वाढविली चुरस… छोट्या-छोट्या सभांच्या माध्यमातून उमेदवार मांडतोय आपली भूमिका
वोहरा यांना मिळतोय चांगला पाठिंबा

