सोमवार, ११ नोव्हेंबर
बटेंगे तो कटेंगे म्हणविणाऱ्यांनी महाराष्ट्रातील युवकांचा रोजगार काटला आहे. महायुतीचा निवडणूक जाहीरनामा नुकताच अमित शहा यांनी जाहीर केला आहे. पंधरा लाख रुपये हा निवडणूक जुमला होता, असे सांगणारे हेच ते अमित शहा आहे. त्यामुळे महायुतीचा हा जाहीरनामा म्हणजे नवा जुमला असल्याचे प्रतिपादन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले.
महाविकास आघाडीचे संगमनेरमधील उमेदवार बाळासाहेब थोरात यांच्या प्रचारार्थ खासदार कोल्हे यांच्या उपस्थितीत संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथे रविवारी महाविकास आघाडीच्या वतीने भव्य युवक मेळावा आयोजित करण्यात आला होता. युवकांच्या या मेळाव्यात खासदार कोल्हे बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर उमेदवार बाळासाहेब थोरात यांच्यासह राज्याचे माजी मंत्री अमित देशमुख, नगर दक्षिणचे खासदार निलेश लंके, शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, जयश्री थोरात, दुर्गाताई तांबे, रणजीतसिंह देशमुख, शिवसेनेचे माजी शहर प्रमुख अमर कतारी आदीसह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.
कोल्हे म्हणाले, सुसंस्कृत राजकारणी आणि राजकारण कसे असावे याचा आदर्श बाळासाहेब थोरात यांनी नव्या पिढीला दिला आहे. बाळासाहेब थोरात सध्याच्या राजकारणातील दीपस्तंभ आहे. तालुक्यात विविध संस्था निर्माण करून तालुक्यातील गोरगरीब आणि त्यांची कुटुंब उभे करण्याचे काम थोरात यांनी केले आहे.
महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेवर टीका करताना कोल्हे म्हणाले, चोरीने पक्ष आणि पक्ष चिन्ह मिळविणारे राज्यात अभिमानाने मिरवू शकत नाही. जनता निवडणुकीतील त्यांना जागा दाखवून देईल.

