संगमनेर – मोहसीन शेख
सर्वसामान्यांच्या प्रश्नांचा कळवळा असल्याचे भासविणाऱ्या महायुती आणि महाविकास आघाडी सरकारने आपल्या कार्यकाळात महागाईचा उच्चांक गाठला आहे. महायुतीच्या काळात उद्योगधंदे दुसऱ्या राज्यात पळविले जात हाताला काम नसल्याने सामान्य माणसाचे जीवनमान अवघड बनत चालले आहे. या पार्श्वभूमीवर सामान्यांच्या प्रश्नाची जाण असलेला वंचित बहुजन आघाडी हाच एकमेव पक्ष असून तोच आश्वासनपूर्ती करेल, यासाठी राज्यातील मतदार, संगमनेरकरांनी वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन संगमनेर विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अब्दुल अजीज वोहरा यांनी केले आहे. 
कोणतीही मोठी आर्थिक ताकद पाठीशी नसताना वैयक्तिक गाठीभेटीवर भर देत उमेदवार अजीज वोहरा यांनी तालुक्यातील मतदारांचे संपर्क करत आपली भूमिका मांडण्याचा धडाका लावला आहे. ‘बौद्ध-मुस्लीम-ओबीसी’ असे नवे समीकरण या वेळी अॅड. आंबेडकर यांनी राज्यात उभे केले आहे. आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून राज्यात सर्वसामान्य कुटुंबातील उमेदवारांना संधी दिली आहे. वंचित बहुजन आघाडी ही आलुत्या-बलुत्यांची असल्याची ग्वाही देतानाच कोणत्याही बड्या असामीच हित न बघता सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नांसाठी त्यांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आपण कार्यरत राहणार असल्याचे आश्वासन ते मतदारांना देत आहे.
चाळीस वर्षापासून संगमनेर तालुक्याला एकच नेतृत्व आहे. मात्र मुस्लिम समाजाचे प्रश्न आजही आहे तसेच आहे. वंचित समाजाला अद्यापही न्याय मिळालेला नाही. सामान्य माणसाच्या जीवनमानात कोणताही बदल झाला नाही. मराठा आरक्षण,ओबीसी आरक्षण, एस. सी. एस. टी. आरक्षणावर यांना बोलायचेच नाही. शेतमाल आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या याबाबत यांना काहीच देणेघेणे नाही. 
तरुणांची बेरोजगारी, जूनी पेन्शन योजना, असंघटीत कामगारांचे जटील प्रश्न, महिला सबलीकरण यावर चकार शब्द बोलायला कोणताही पक्ष आज तयार नाही. महायुतीला धर्माच्या नावावर राजकारण करावयाचे असून महाविकास आघाडीला घराणेशाहीचा वारसा जपायचा आहे.
त्यामुळे आता मतदारांसमोर त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी हाच एकमेव पक्ष असून जास्तीत जास्त संख्येने समाजातील वंचित घटकांनी वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची आवश्यकता आता निर्माण झाली आहे. मतदानाला जाण्यापूर्वी प्रत्येक मतदाराने एकदा वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा (जोशाबा) वाचलाच पाहिजे, असे देखील वोहरा म्हणाले.
मतदार वंचितसोबत येत आहे…
लोकसभेत आघाडीच्या उमेदवारांना एक गठ्ठा मतदान केले तरी मुस्लिम समाजाच्या सामाजिक धार्मिक प्रश्नांवर आणि भाजप, आरएसएसच्या माध्यमातून होणाऱ्या सामाजिक बदनामी विरोधात कोणीच बोलत नाहीत. भाजप आणि आघाडीने मुस्लिम समाजाला धोका दिला आहे. त्यामुळे नवीन पर्याय म्हणून संगमनेर तालुक्यात ओबीसी, मागासवर्गीय, मुस्लिम आणि गरीब मराठा मोठ्या संख्येने वंचित सोबत येत आहे. – अजीज वोहरा, उमेदवार, संगमनेर विधानसभा मतदारसंघ.

