राहाता – शिर्डी विधानसभा मतदारसंघात प्रचंड दहशत आणि दडपशाही असल्याचे मला सांगितले गेले. ही लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये जर कोणी दहशत आणि दडपशाही करत असेल तर ती उध्वस्त करण्याची ताकद तुम्हा मतदारांमध्ये आहे. इथल्या दहशतवादाला घाबरू नका, या दडपशाहीचा बंदोबस्त करावाच लागेल असा इशारा देतानाच निळवंडे धरणाचे काम फक्त बाळासाहेब थोरात यांच्यामुळेच झाले. नगरच्या विकासात जर कोणाचा हात असेल तर तो बाळासाहेब थोरात यांचा असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.
शिर्डी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रभावती घोगरे यांच्या प्रचारासाठी पवार यांची बुधवारी दुपारी राहाता येथे सभा झाली यावेळी ते बोलत होते.
व्यासपीठावर राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ, राजेंद्र फाळके, करण ससाने, रावसाहेब म्हस्के, आमदार रिटा चौधरी आदीसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी होते.
पवार आणि विखे पाटील यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. या पार्श्वभूमीवर पवार यांनी विखेंच्या बालेकिल्ल्यात जोरदार फटकेबाजी करत सभा गाजवली. सभेत शरद पवारांनी विखे पाटलांच्या नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण करत त्यांच्यावर टीकेचे बाण सोडले. विखेंवर टीका करतानाच दुसरीकडे पवार यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले.
पवार म्हणाले, लोकसभेमध्ये महाराष्ट्रातील जनतेने महाविकास आघाडीला मोठी ताकद दिली. यामुळे राज्य सरकार घाबरले असून फक्त घोषणाबाजी करत आहे. महिलांना पंधराशे रुपये दिले जात आहेत, मात्र महिलांना पैसे महत्त्वाचे नसून त्यांची सुरक्षितता महत्त्वाची आहे. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर महिलांना तीन हजार रुपये तर बेरोजगार युवकांना चार हजार रुपये भत्ता देणार आहोत.
या भागाची मला चिंता वाटते. पुर्वी या ठिकाणी पेरूच्या मोठ्या प्रमाणात बागा होत्या. मात्र आता हे क्षेत्र घटलं आहे. पाणी कमी असल्याचं कारण सांगितलं जातं. असं असेल तर इथला आमदार कोण आहे? असा प्रश्न त्यांनी उपस्थितांना केला.
विखे यांचे नाव न घेता पवारांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली. त्यांना तुम्ही अनेक वेळा निवडून दिलं. अनेक वेळा ते मंत्री ही होते. सर्व साधन सामुग्री आणि यंत्रणा ही त्यांच्या हाताखाली होती. पण या नेतृत्वाला सामान्य माणसाची चिंता नाही. पाणीसाठी दोनशे कोटी आल्याचे सांगत होते. पण ते गेले कुठे असा प्रश्नही पवारांनी केला. मोठे आकडे सांगायचे आणि लोकांना भुलवायचं हा दृष्टीकोन इथल्या नेतृत्वाचा आहे असा आरोपही त्यांनी केली.
नगरमध्ये गोरगरीबांच्या मुलांसाठी नॉलेज सिटी उभारण्याचा विचार आपण केला होता असे पवार म्हणाले. त्यात सर्व प्रकारचे शिक्षण गरीबांच्या मुलांना दिले जाणार होते. त्यासाठी शेती महामंडळाची जमिनही दिली जाणार होती. पण त्यावेळी त्यात कोणी तरी खोडा घातला असा आरोपही पवारांनी विखेंचे नाव न घेता केला. जर इथं नॉलेज सिटी झाली तर आमच्या कॉलेजचं काय होणार याची चिंता त्यांना होती. जर गोरगरीबांच्या मुलांनी तिथं शिक्षण मिळायला लागलं तर आमच्याकडे कोण येणार याची जास्त काळजी त्यांना होती. त्यामुळेच या लोकांनी खोडा घातला.
इथले आमदार आज ज्या पक्षात आहेत तो पक्ष त्यांचा आहे का? ते राज्याचे विरोधी पक्षनेते होते. पण त्यांनी सत्तेसाठी वाट्टेल ती तडजोड केली. वाट्टेल त्या गोष्टी केल्या. अशा लोकांकडून विकास कधीच होणार नाही. नगरच्या विकासात जर कोणाचा हात असेल तर बाळासाहेब थोरातांचा आहे अशी कौतूकाची थापही पवारांनी थोरातांना दिली. निळवंडेचं काम जर कोणामुळे झालं असेल तर ते बाळासाहेब थोरातांमुळे झाल्याचंही ते म्हणाले. ज्या माणसाला आपल्या मतदार संघातील मुख्य रस्तेही करता येत नाहीत तो कसला विकास करणार. उद्धवस्त करण्यासाठी अक्कल लागत नाही, काही उभं करायचं असेल तर अक्कल लागते असा टोलाही पवारांनी लगावला. शिवाय ही दहशतवाद्यांची टोळी आहे. या टोळीचा या निवडणुकीत बंदोबस्त करा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
त्यामुळेच हे असलं राजकारण संपवलं पाहीजे. इथलं चित्र बदलायचा निकाल इथल्या जनतेला घ्यावा लागेल असं आवाहन त्यांनी केलं. त्यामुळेच काँग्रेसच्या उमेदवार प्रभावती घोगरे यांना विजयी करण्याचे आवाहन केले. प्रभावती या माझ्या मुलीसारख्या आहेत. शिवाय ज्या घरातल्या त्या सुनबाई आहेत त्या घराबरोबरही माझे जवळचे संबध आहेत. त्यामुळे मी सांगितल्यावर तुम्ही त्यांना मतदार करणार ना असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
घोगरे यांना भाषण बंदीची नोटीस…
या तालुक्यातील दहशतवाद मोडून टाकण्यासाठी ही स्वातंत्र्याची लढाई आहे .सर्वांनी प्रभावतीताई घोगरे यांच्या पाठीशी उभे राहून हा तालुका गुलामगिरीतून मुक्त करावा. पेरूच्या बागा असलेला हा तालुका समृद्ध होता. परंतु कारखाना बंद झाला. बाजारपेठ उदास झाली. महागाई बेरोजगारी वाढली. हे सर्व असताना सोयाबीनचे भाव काय आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. हे सर्व सोडून जातीयतेच्या प्रश्नांवर राजकारण भाजपा नेवू पाहत आहे. घोगरे यांना भाषण बंदीची नोटीस देण्यापर्यंत घाबरले की काय अशी विचारणाही आमदार थोरात यांनी केली.

