शुक्रवार, १५ नोव्हेंबर
संगमनेर – मोहसीन शेख
संगमनेर विधानसभा निवडणुकीत मुस्लिम समाजासाठी महत्त्वपूर्ण समजला जाणारा बहुचर्चित एसटीपी (STP) प्लांटचा मुद्दा कळीचा बनला आहे. विद्यमान आमदार आणि महाविकास आघाडी, महायुती आणि अन्य प्रमुख उमेदवारांनी या संदर्भातील भूमिका स्पष्ट करण्याची मागणी मुस्लिम समाजातून होत आहे. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अजीज वोहरा यांनी यासंदर्भात समाजासोबत राहण्याचे आश्वासन दिल्याने त्यांना समाजातून पाठिंबा मिळत आहे. मुस्लिम समाजाची एक गठ्ठा मते वोहरा यांच्या पारड्यात जाण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. 
संगमनेर विधानसभा निवडणुकीच्या प्रचार अंतिम चरणाकडे जात असताना वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अजीज वोहरा यांनी विविध समाजातील बहुचर्चित प्रश्नांवर बोट ठेवत त्या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करत असल्याने मतदारांचा एक मोठा वर्ग त्यांच्या पाठीमागे जाताना दिसत आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांच्या तुलनेत वोहरा यांच्याकडे प्रचाराची साधनसामग्री, कार्यकर्त्यांचे संख्याबळ कमी असले तरी ते मतदारांपर्यंत पोहोचण्यात यशस्वी होत असल्याचे दिसत आहे. 
वंचित बहुजन आघाडीने या मतदार संघातून मुस्लिम समाजातील चेहरा म्हणून अजित वोहरा यांना उमेदवारी दिली असली तरी विविध त्यांचा असलेला स्नेह लक्षात घेता त्यांना विविध समाजातून पाठिंबा मिळत आहे. मुस्लिम दलित ओबीसी आधी समाजातील निर्णायक मते आपल्याकडे वळविण्यात ते यशस्वी होण्याची चिन्हे आहेत. शहरासोबतच ग्रामीण भागात वोहरा यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. छोट्या-छोट्या कॉर्नर सभा, मीटिंग, पदयात्रा आदींच्या माध्यमातून आपल्या वकृत्व आणि संभाषणाच्या द्वारे वंचित बहुजन आघाडीची राजकीय भूमिका, जाहीरनामा, वंचित ने आतापर्यंत केलेली वाटचाल याबद्दल प्रखरपणे बाजू मांडताना दिसत आहे.
एकीकडे हे चित्र असले तरी दुसरीकडे गेल्या चार दशकांपासून येथील मुस्लिम समाज महाविकास आघाडीचे उमेदवार बाळासाहेब थोरात यांच्यासोबत सातत्याने राहिला आहे. समाजातील बहुतांशी आजी-माजी नगरसेवक, इतर पदाधिकारी सद्यस्थितीत थोरात यांच्यासोबत दिसत असले तरी पूर्वीच्या तुलनेत मुस्लिम समाज थोरात यांच्यासोबत दिसत नाही. यामागे समाजातील काही प्रश्न असून विशेषत: एसटीपी प्लांटच्या बहुचर्चित प्रश्नासंदर्भात त्यांनी आपली भूमिका अद्याप जाहीर केलेली नाही याबद्दल समाजात नाराजी आहे. हे नाराजी मतांच्या रूपाने वंचितचे उमेदवार वोहरा आपल्या पारड्यात वळविण्याची शक्यता आहे.
एसटीपी प्लांट च्या विषयावर समाजाच्या नागरिकांनी ५२ दिवसांचे साखळी उपोषण केले, ८-१० हजार नागरिकांनी प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. याची दखल घेत तत्कालीन प्रांताधिकारी कथा नगरपालिका प्रशासक शशिकांत मंगरुळे, तत्कालीन मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी उपोषण स्थळी भेट देत ऑगस्ट २०२२ मध्ये लेखी पत्र देत नियोजित जागेत एसटीपी प्लांट चे काम स्थगित करत असल्याचे स्पष्ट केल्याने उपोषण मागे घेण्यात आले. मात्र या संदर्भात ज्यांच्याकडून समाजाला अपेक्षा आहे त्या आमदार थोरात यांनी यासंदर्भात अद्यापही आपली भूमिका स्पष्ट केलेली नसल्याने समाजात नाराजीचे वातावरण आहे.
समाजातील कार्यकर्ते पदाधिकारी वगळता सामान्य समाज मात्र नेहमी आंदोलनातून मुस्लिम ओबीसी वंचित घटकांसाठी स्पष्ट भूमिका मांडणाऱ्या वंचितचे उमेदवार अजीज वोहरा यांच्या प्रचारात दिसत आहे.

