विशेष प्रतिनिधी | मुंबई
राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचा तिढा आता सुटल्यात जमा आहे. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनवण्याचा आग्रह करणारे ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के आणि सिडकोचे चेअरमन संजय शिरसाठ यांनी आग्रह धरूनही भाजपने त्यांना धूप घातली नाही. अखेर मुख्यमंत्रीपदाची मागणी शिंदे गटाला म्यान करावी लागली आहे. हे पद भाजपकडे जाणार हे निश्चित आहे. मात्र ते कोणाच्या गळ्यात जाईल हे स्पष्ट झालं नसलं तरी त्या पदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पहिली पसंती असल्याने फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील असं मानलं जातं.
फडणवीस दिल्लीला – विधानसभा निवडणुकीतील दिग्विजयानंतर सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग आला आहे. मुंबईत भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या अंतर्गत बैठका सुरु आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झाले आहेत. ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेणार आहेत. या बैठकीत मुख्यमंत्रिपदाचा तिढा सुटू शकतो. 
पुन्हा दोन उपमुख्यमंत्रीपद – राज्यात पुन्हा एकदा दोन उपमुख्यमंत्रिपदांचा पॅटर्न राबवला जाण्याची शक्यता आहे. अजित पवारांसह एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्रिपद दिलं जाऊ शकतं. सर्वाधिक आमदार निवडून आलेल्या भाजपकडेच मुख्यमंत्री पद जाणार असल्याने देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला भाजपच्या नेतृत्त्वानं हिरवा कंदिल दिला आहे. त्यांच्या नावाला हो नाही करत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेदेखील मान्यता दिली आहे. मुख्यमंत्रीपदासाठी फडणवीस यांच्या नावाला भाजपच्या नेतृत्त्वानं मंजुरी दिलेली आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली. फडणवीस मुख्यमंत्री होतील आणि शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसला उपमुख्यमंत्रिपद देण्यात येणार आहे.
मुख्यमंत्रीपदासाठी शिंदेही प्रयत्नशील – मुख्यमंत्रिपद आपल्याकडेच राहावं यासाठी एकनाथ शिंदे यांचे बरेच प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी ते गेल्या ३६ तासांपासून वाटाघाटी करत आहेत. पण शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्रिपद मिळण्याची शक्यता नाही. त्यांना उपमुख्यमंत्रिपद दिलं जाऊ शकतं. शिवसेनेला १२ मंत्रिपदं दिली जाण्याची शक्यता आहे. त्यात काही महत्त्वाची खाती असतील. तर राष्ट्रवादी काँग्रेसला १० मंत्रिपदं मिळतील. भाजप स्वत:कडे २१ मंत्रिपदं ठेवणार आहे.
महत्त्वाचे खाते मित्र पक्षांना – गृह, अर्थ, शहर विकास, महसूल ही महत्त्वाची खाती मित्रपक्षांना सोडण्यास भाजप सुरुवातीला तयार नव्हता. पण आता यातील काही खाती मित्रपक्षांना देण्याची तयारी भाजपने दर्शवली आहेत. गृह आणि अर्थ खाती आपल्याकडेच असावीत असा भाजपचा आग्रह आहे. यासाठी सध्या वाटाघाटी सुरु आहेत.
दिल्लीत शिंदे फडणवीस पवार बैठकीला – अखेरच्या क्षणी मंत्रिपदांमध्ये, विभागांमध्ये बदल होऊ शकतो, असं सुत्रांनी सांगितलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी दिल्लीत आज महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीला शिंदे, फडणवीस आणि पवार हजर असतील. यामध्ये मुख्यमंत्रिपदासह अन्य मंत्रिपदांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. मित्रपक्षांना मंत्रिमंडळात सन्मानजनक वाटा देण्यात येईल, असा शब्द भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्वाकडून शिंदे, पवारांना देण्यात आला आहे.

