मंगळवार २६ नोव्हेंबर – मुंबई
माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत जे घडलं ते शिवसेनेच्या बाबतीत घडू नये यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुरेपूर काळजी घेत आपल्या सर्व विजयी झालेल्या आमदारांना मुंबईतील ताज लँड हॉटेलमध्ये ठेवले होते. या नवनिर्वाचित आमदारांना एका अटीवर घरी जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार आपल्या मतदारसंघात परतू शकणार आहेत. 
आमदारांबाबत खबरदारी – विधानसभा निवडणुकीत राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्या दष्टीने राजकीय घडामोडी सुरू आहेत. स्पष्ट बहुमत मिळाले असले तरी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पक्षाच्या आमदारांबाबत विशेष खबरदारी घेतली आहे. 
ताज लँड या बड्या हॉटेलमध्ये आमदारांचा मुक्काम – निवडून आलेल्या आमदारांना त्यांनी मुंबईतील ताज लँड या बड्या हॉटेलमध्ये ठेवले होते. मुंबईत सर्व आमदारांना एकत्रित केल्यानंतर त्यांनी आमदारांकडून पक्षासोबत असल्याचे ॲफिडेव्हिड करून घेतले असून आता एफिडेविट देणारे आमदार पक्षप्रमुखांची परवानगी घेऊन आपल्या घरी जाऊ शकतात अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. अशा आशयाचे वृत्त एका वृत्तवाहिनीने दिले.
महायुतीतील शिवसेना महत्त्वाचा पक्ष – महायुतीतील भाजप पाठोपाठ मुख्यमंत्री शिंदे यांचा शिवसेना पक्ष महत्त्वाचा घटक पक्ष असून या पक्षाच्या उमेदवारांनी राज्यात ५७ जागांवर विजय मिळविला आहे. तर भारतीय जनता पक्षाने सर्वात जास्त १३१ जागा जिंकले आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने देखील मोठे यश मिळवत ४१ जागांवर विजय संपादन केला. याशिवाय अपक्ष आणि मित्र पक्षाचे काही आमदार देखील शिवसेने सोबत असून शिवसेनेचे संख्याबळ ६१ वर पोहोचले असल्याची माहिती खासदार नरेश म्हस्के यांनी दिली. या आमदारांमध्ये अशोक माने, राजेंद्र यड्रावकर, शरद सोनवणे आणि रत्नाकर गुट्टे यांचा समावेश असून ते देखील या आमदारांसोबत हॉटेलमध्ये असल्याची माहिती समोर येत आहे.


