मंगळवार २६ नोव्हेंबर – अहिल्यानगर
अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वत्र पशु गणनेचे काम २८ फेब्रुवारी पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. या मोहिमेत पशुपालकांनी आपल्याकडील जनावरांची खरी माहिती देण्याचे आवाहन अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले आहे.
यांची होणार गणना – या पशुगणनेत गाय वर्ग, म्हैस वर्ग, शेळी, मेंढी, अश्व, वराह यांच्यासह बिल्ला मारलेल्या (टॅगिंग केलेल्या) जनावरांची व भटक्या समुदायातील पशुधनाची देखील गणना करण्यात येणार आहे.
पशु गणनेसाठी यांची केली नियुक्ती – जिल्ह्यातील ग्रामीण भागात २९५ प्रगणक व ७६ पर्यवेक्षक तर शहरी भागात ५६ प्रगणक व १८ पर्यवेक्षकांची या कामासाठी नियुक्ती केली जाणार आहे.
पशु गणना कशासाठी – पशुगणनेमुळे जनावरांची नेमकी संख्या स्पष्ट होते. त्यानुसार शासनाकडून धोरण, योजना आखल्या जातात. निधीची उपलब्धता केली जाते, शिवाय पशुवैद्यकीय दवाखान्याच्या कार्यक्षेत्रात असलेल्या पशुधनानुसार लसीकरणासाठी औषधांचा पुरवठा केला जातो. 
आवाहन – याचा फायदा पशुपालकांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाय योजना राबवितांना होणार असल्याने आपल्याकडील जनावरांची माहिती द्यावी – डॉ. सुनिल तुंबारे, पशुसंवर्धन उपायुक्त.


