सोमवार ०९ डिसेंबर – विशेष प्रतिनिधी / मुंबई
भाजपा आमदार राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदी सलग दुसऱ्यांदा निवड करण्यात आली आहे. रविवारी नार्वेकर यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा अर्ज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत अर्ज भरला. पण त्यानंतर विरोधकांकडून कोणीही अर्ज न भरल्याने नार्वेकरांची बिनविरोध निवड झाली. ज्याची औपचारिक घोषणा आज विधानसभेत करण्यात आली. यानंतर सलग दुसऱ्यांदा अध्यक्ष बनलेल्या नार्वेकरांनी सर्वांचे आभार मानत विरोधकांना महत्त्वाचे आश्वासन दिले. तसेच यापुढे आता कोणीही सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार टाकणार नाही, अशी विनंती नार्वेकरांकडून करण्यात आली आहे.
विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकरांची निवड झाल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी आणि विरोधकांनी यासाठी अभिनंदन प्रस्ताव मांडला. हा प्रस्ताव स्वीकारत नार्वेकरांनी सर्व सदस्यांचे आभार मानले. यावेळी ते म्हणाले की, सर्वांच्या सदिच्छा सोबत घेत मी विधानसभा अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारत आहे. आजच्या या विधानसभेतील चित्र सत्तारूढ पक्षाच्या बाजूने असले, महायुतीचे एकूण २३७ आमदार असले तरीही विधानसभेच्या सर्व २८८ सदस्यांना समान संधी देण्याची ग्वाही आज मी या सभागृहाला देतो. 
यावेळी त्यांनी काँग्रेस आमदार नाना पटोले यांना उद्देशून म्हटले की, नाना आपली संख्या जरी कमी असली तरी विरोधकांचा आवाज कमी राहणार नाही, ही जबाबदारी माझी राहील,” असे आश्वासन नार्वेकर यांनी दिले. यावेळी नार्वेकर यांनी विरोधकांसाठी शायरी बोलून दाखवली. याबाबत ते म्हणाले की, विरोधी पक्ष किती महत्त्वाचा आहे, विरोधी पक्षाची बाजू जाणून घेणे, हे किती आवश्यक आहे याची कल्पना आहे, असे म्हणत त्यांनी चार ओळीतून ते व्यक्त करत म्हटले की, “तुम पर कोई जबरदस्ती नहीं की तुम मेरी सारी बाते मानो… मुझे सिर्फ इतना पता है की, मेरे लिए तुम बहुत जरुरी हो… अब आगे तुम जानो…” असा चिमटा त्यांनी विरोधकांना काढला आहे. 
तर, सभागृहातील सर्व सदस्यांचे सहकार्य लाभेल, अशी आशा देखील यावेळी नार्वेकर यांनी यावेळी व्यक्त केली आहे.

