मंगळवार, १० डिसेंबर – अहिल्यानगर
अवसायानात निघालेल्या नगर अर्बन सहकारी बँकेमध्ये अडकलेल्या पाच लाखांपेक्षा वरील ठेवी परत मिळवण्यासाठी ठेवीदारांची संघटित शक्ती निर्माण करण्याची आवश्यकता असल्याने बँकेच्या ठेवीदारांचा रविवारी (दि. १५) सकाळी ११ वाजता शहरातील महाजन गल्लीतील गायत्री मंदिरात ठेवीदारांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. बँक बचाव कृती समितीचे सदस्य डी. एम. कुलकर्णी यांनी ही माहिती दिली.
या संदर्भात अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की, अर्बन बँकेच्या पाच लाखांच्या आतील ठेवीदारांना त्यांच्या ठेव रकमा प्राप्त झाल्या आहेत. मात्र, त्यापैकी कोणाही ठेवीदाराकडून बँक बचाव कृती समितीला याची माहिती दिली नाही. या ठेवीदारांना ठेवी मिळवून देण्यासाठी समितीने मोठा संघर्ष केला, लढा उभारला, याचाही ठेवीदारांना विसर पडला आहे. त्यामुळे समितीचे सदस्य व कार्यकर्ते नाराज झाले आहेत.
मध्यंतरी बँकेचे अवसायक गायकवाड यांच्याकडील दुःखद घटनेमुळे ते जवळपास दोन-अडीच महिने बँकेत नियमित येत नव्हते. त्यामुळे बँकेच्या कर्जदारांकडील वसुलीवर मोठा परिणाम होऊन वसुली थंडावली. परिणामी ठेवीदारांना देण्यासाठी सध्या बँकेकडे पुरेसा निधी उपलब्ध नाही. काही ठेवीदारांनी त्यांच्या ठेव रकमा मिळवण्यासाठी अवसायकांची भेट घेऊन अकारण अकांडतांडव केला. अर्वाच्य भाषा वापरून वाद घातला. त्यामुळे अवसायक अवमानित झाले. 
या ठेवीदारांनी बँक बचाव कृती समितीच्या न्यायालयीन लढ्यासाठी निधीची व्यवस्था करणारे राजेंद्र चोपडा व राजेंद्र गांधी यांच्यावरही अयोग्य आरोप करून अवमानकारक भाषा वापरली. यामुळे ठेवीदारांसाठी काम न करण्याच्या मनस्थितीत ते आहेत. विधानसभा निवडणुका व अन्य कारणामुळे पोलीस दलाकडून बँकेच्या घोटाळ्याच्या तपासाकडे दुर्लक्ष झाले. पोलिसांनी जप्त केलेल्या मालमत्तेच्या लिलावाची प्रक्रियाही थंडावली आहे. 
ठेवीदारांनी समितीकडे पाठ फिरवल्याने ठेवीदारांच्या दृष्टीने हालचाली थंडावल्या आहेत. यामुळे पाच लाखांवरील ठेवी मिळवण्यासाठी ठेवीदारांच्या संघटित शक्तीची गरज आहे. या संदर्भात माहिती देण्यासाठी हा मेळावा होईल, असे कुलकर्णी यांनी सांगितले.

