बुधवार, ११ डिसेंबर
तत्कालीन मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी पालिकेसाठी दिलेल्या निधीतून शंभरावर कामे गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित आहे. रखडलेल्या या कामांमुळे नागरिकांचे मोठे हाल होत आहे. ही काम तातडीने पूर्ण केली जावीत यासाठी तत्कालीन नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्यासह माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी पालिकेवर मोर्चा नेत प्रशासकांना मागण्यांचे निवेदन दिले.
यांनी दिले निवेदन – मुख्याधिकारी रामदास कोकरे यांना हे निवेदन देण्यात आले असून यावेळी माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, दिलीप पुंड व विश्वास मुर्तडक यांच्यासह माजी नगराध्यक्ष तथा काँग्रेसचे शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, किशोर टोकसे, किशोर पवार, नूर मोहम्मद शेख, शैलेश कलंत्री, सिद्राम दिद्दी, योगेश जाजू, प्रमोद कडलग, अफजल शेख, एकनाथ श्रीपाद, प्रमिला अभंग, शीतल भुसाळ, मिलिंद औटी, हर्षल राहणे, मोहसीन शेख, अंबादास आडेप, जीवन पंचारिया, रिजवान मंत्री, अमित गुंजाळ, कमलेश उनवणे, गौरव डोंगरे, अंबादास आडेप आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, स्वच्छ व सुंदर संगमनेरमध्ये सध्या कचरा व्यवस्थापन होत नसल्याने नागरिकांना त्रास होत आहे. लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी रस्त्यांच्या कामासाठी निधी मिळून देऊन सुद्धा मागील तीन वर्षापासून प्रशासनाने अनेक रस्त्यांची कामे केलेली नाहीत. रस्त्यांना खड्डे पडले आहेत. अनेक ठिकाणी गटार तुंबले आहेत. त्याचप्रमाणे शहर व उपनगरातील अनेक पथदिवे बंद आहेत. गुन्हेगारीच्या काही घटना घडत आहेत. शहर व उपनगरांमध्ये डास निर्मूलनासाठी फवारणी होणे अत्यंत गरजेचे आहे. त्याचबरोबर घंटागाडी नेमून दिलेल्या वेळेस प्रभागात जात नसल्याने अनेक नागरिक रस्त्यांच्या कडेला कचरा टाकत आहेत. शहर, उपनगरात कचऱ्यासह मोकाट जनावरांचे प्रमाण वाढले असून या सर्वांचा बंदोबस्त करण्यात यावा तसेच सर्व प्रलंबित कामे तातडीने सुरू करावीत अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या निधीतून म्हाळुंगी पुलाचे काम… संगमनेर शहरातील अनेक विकास कामांसाठी लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी मोठा निधी मिळवला आहे. म्हाळुंगी नदीवरील पूल तातडीने व्हावा, यासाठी बाळासाहेब थोरात यांनी निधी मिळवला. मात्र फक्त राजकारण करण्यासाठी प्रशासनाने काम थांबविले आणि आता सुद्धा हे काम संथगतीने सुरू केले आहे. यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत असून तातडीने हा पूल पूर्ण करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
नगरपालिका प्रशासन दखल घेईल…
शहरातील विविध समस्या संदर्भात निवेदन मिळाले आहे. निवेदनातील मुद्द्यांच्या आधारे समस्यांची शहरात प्रत्यक्षात पाहणी करून पडताळणी केली जाईल. नागरिकांना त्रास होणार नाही. आंदोलने, मोर्चे होणार नाही याची नगरपालिका प्रशासन दखल घेईल. – रामदास कोकरे, मुख्याधिकारी.



