सोमवार ३० डिसेंबर
संगमनेर – शहरातील बीएड कॉलेज रस्त्यावर असलेल्या भाजीपाला विक्रेत्यांवर नगरपरिषदेने कारवाईचा बडगा उगारला आहे. नगरपालिकेने ट्रॅक्टर पाठवून देतील भाजीपाला विक्रेत्यांना निघून जाण्यास सांगितले. नगरपालिकेची ही कारवाई अत्यंत मनमानी असून नगरपालिकेचा अन्याय सहन करणार नसल्याचा इशारा नगरपालिकेच्या पथविक्रेता समितीचे सदस्य ॲड. संग्राम जोंधळे यांनी दिला आहे.
या मनमानी कारवाईचा निषेध करण्यासाठी भाजीपाला विक्रेते एकत्र जमा झाले होते, यावेळी जोंधळे बोलत होते. संघर्ष संघटनेचे जिल्हाध्यक्ष केशवराव जाधव, शहराध्यक्ष दत्तात्रय कांडेकर, भाजीपाला विक्रेते माजी सरपंच लांडगे यांच्यासह भाजीपाला विक्रेते यावेळी उपस्थित होते.
जोंधळे म्हणाले, संगमनेर शहरांमध्ये नेहरू चौक, बी. एड. कॉलेज, मालदाड रोड, नवीन नगर रोड अशा अनेक ठिकाणी भाजीपाला विक्रेते व फळ विक्रेते व्यवसाय करण्यासाठी रस्त्याच्या कडेला बसतात व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात. गेल्या वीस वर्षांमध्ये नगरपालिकेने ज्या प्रमाणात शहराची वाढ झाली, ज्या प्रमाणात लोकसंख्येची वाढ झाली, त्या प्रमाणामध्ये नवीन भाजीपाला व फळ विक्रीसाठी मार्केटची सुविधा नगरपालिकेने उपलब्ध करून दिली नाही.
उलट या विक्रेत्यांकडून मनमानी पद्धतीने ठेकेदारामार्फत पन्नास रुपयांपासून दोनशे, तीनशे रुपयापर्यंत पट्टी वसूल केली जाते. काही वेळेस पावती पण दिली जात नाही. ज्या प्रमाणात कर गोळा केला जातो परंतु त्याची कोणतीही सुविधा नगरपालीकेकडून या विक्रेत्यांना दिली जात नाही.
वास्तविक भाजीपाला विक्री, फळविक्री ही अत्यावश्यक सेवा आहे. या सेवेचा कोणताही कर नगरपालिकेने घ्यायला नको, परंतु तसे न करता मनमानी पद्धतीने अनेक वेळा नगरपालिका या भाजीपाला विक्रेत्यांना हटविण्याचे काम करते. नगरपालिकेने जर व्यवस्थित मार्केट सुरू केले तर त्या ठिकाणी हे भाजीपाला विक्रेते आपल्या भाजीपाल्याची विक्री करू शकतात परंतु नगरपालिकेच्या अनास्थेमुळे या लोकांना रस्त्यावर बसून भाजीपाला विकण्याची वेळ येत आहे.
पथविक्रेता समितीकडून नगरपालिकेला इशारा देण्यात येतो की, त्यांनी समितीशी चर्चा केल्याशिवाय मनमानी पद्धतीने कोणतीही कारवाई करू नये. केल्यास मोठ्या प्रमाणात असंतोष आणि आंदोलनाला सामोरे जाण्याची तयारी नगरपालिकेला ठेवावी लागेल. – ॲड. संग्राम जोंधळे, पथविक्रेता समितीच सदस्य व संघर्ष सामाजिक संघटनेचे संस्थापक.




