विशेष प्रतिनिधी / मुंबई
मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी कथित आरोपी वाल्मिक कराड याचे पाठीराखे असलेले मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधातील पुरावे मिळाल्याशिवाय त्यांना मंत्रिमंडळातून दूर केलं जाणार नसल्याचं आता स्पष्ट झालं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच यासंबधीचा खुलासा करत मुंडे यांची एकप्रकारे पाठराखण केली आहे. 
संतोष देशमुखांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याची मागणी केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृहाबाहेर माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी विरोधक मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी करत आहेत असा प्रश्न केला. त्यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, “मला या प्रकरणातील राजकारणात जायचं नाही. मी अगोदरपासून सांगत आलो आहे की, कोणाही विरोधात पुरावा असेल तर द्या. आम्हीही पुरावे शोधत आहोत. पण दुसऱ्या कोणाकडे पुरावे असतील तर, त्यांनीही द्यावेत. मात्र ज्याच्या विरोधात पुरावा असेल, त्यांच्यावर कारवाई केली जाईल.
याशिवाय, “माझ्या मते संतोष देशमुख यांच्या हत्येला कारणीभूत असलेल्या लोकांना शिक्षा होणे हे महत्त्वाचे आहे. पण काही लोकांना राजकारण महत्त्वाचं आहे. त्यांचं राजकारण त्यांना लखलाभो. त्यांच्या राजकारणाने फार काही फायदा होईल असे मला वाटत नाही. त्यामुळे मला कोणत्याही राजकीय वक्तव्यामध्ये जायचं नाही, त्या वक्तव्याचे समर्थन अथवा त्याचा विरोध करायचा नाही. हे राजकारण त्यांनी त्यांच्या ठिकाणी करत राहावं, असेही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
दरम्यान, काल (३० डिसेंबर) सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महायुती सरकारमधील अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी भेट घेतली. त्यावेळी राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी यावरून शंका उपस्थित केली. त्यानुसार, काल (30 डिसेंबर) राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री धनंजय मुंडे हे सह्याद्री अतिथीगृहावर दीर्घकाळ चर्चा करत होते. पण काल या दोघांनी चर्चा करावी आणि आज वाल्मिक कराड CID ला शरण यावं, हा योगायोग म्हणावा की पोलिसांच्या हाताला न लागता, तो स्वत:च पोलीस स्टेशनला जावा. हे घडवलेलं नाट्य आहे का, अशी शंका महाराष्ट्राच्या जनतेमध्ये असल्याचे सांगत जाधव यांनी महायुतीवर निशाणा साधला.


