अहिल्यानगर –
गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यात सुरू असलेल्या जिल्हा विभाजनासंदर्भात जलसंधारण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाष्य केले आहे. अहिल्यानगर जिल्ह्याच्या विभाजना संदर्भात कोणताही प्रस्ताव नाही. एवढेच नव्हे तर राज्यातील कोणत्याही जिल्ह्याच्या विभाजनाचा प्रस्ताव सरकार समोर नसल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
जलसंधारण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील अहिल्यानगर शहरात पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, अहिल्यानगर जिल्हा विभाजनाचा प्रश्नच नाही. आपण महसूल मंत्री असताना जिल्हा विभाजनाचा कोणताही प्रस्ताव आला नव्हता. जिल्हा विभाजनाच्या बातम्या कोण उडवतात हेच कळत नाही.
जिल्हा बँकेचा कारभार पारदर्शक आणि भरती प्रक्रियेचे समर्थन – जिल्हा सहकारी बँकेच्या कारभार पारदर्शक असून, देशपातळीवर बँकेचे काम उत्तम पद्धतीने सुरू आहे. बँकेची भरती योग्य पद्धतीने सुरू असून, काही लोक बँकेची बदनामी का करत आहेत, असा प्रश्न उपस्थित करत जिल्हा बँकेच्या कारभार आणि भरती प्रक्रियेचे समर्थन त्यांनी केले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीतच – आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणून लढणार आहोत. दिल्लीच्या आपच्या माजी मुख्यमंत्र्यांकडे लक्ष देण्याची गरज नाही. ज्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे तुरुंगवास भोगावा लागला, त्यांनी इतरांवर आरोप करू नयेत, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले
खासदार लंके यांच्यावर टीका – जलजीवन मिशन योजनेच्या कामांत भ्रष्टाचार असल्याचा आरोप खासदार नीलेश लंके यांनी केला. त्याला प्रत्युत्तर देताना मंत्री विखे म्हणाले, या कामात काही त्रुटी, उणिवा असू शकतात. यामुळे या योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करणे चुकीचे आहे. पाणीपुरवठा विभागाचे मंत्री म्हणून गुलाबराव पाटील या विभागाचा कारभार पाहण्यासाठी सक्षम आहेत. मात्र, काही लोकांना कामच राहिले नाही. यामुळे ते जनतेमध्ये राहण्यासाठी ओढून-ताणून आरोप करत आहेत. जनतेने त्यांना नाकारलेले असून, त्यांचा कार्यकाळ आता संपत आला आहे.



