मुंबई, दि. २२ :-
जळगाव जिल्ह्यातील पाचोरानजीकच्या रेल्वे दुर्घटनेतील मृतांप्रती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोकसंवेदना व्यक्त करून, मृतांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. मृतांच्या कुटुंबिंयांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा करून, जखमींवर शासनाच्या वतीने मोफत उपचार केले जावेत असे निर्देशही त्यांनी दिले आहेत.
मुख्यमंत्री फडणवीस जागतिक अर्थ परिषदेच्या निमित्ताने दावोस दौऱ्यावर आहेत. तेथून त्यांनी या दूर्घटनेची माहिती घेतली. दूर्घटनास्थळी मंत्री गिरीश महाजन पोहचून मदत व बचावासाठी आवश्यक गोष्टींचे व्यवस्थापन करत असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.
याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी दृकश्राव्य संदेश जारी केला आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचा उल्लेख करून त्यांनी म्हटले आहे की, काही लोकांचा मृत्यूची ही घटना अतिशय वेदनादायी आहे. जळगांव जिल्हा प्रशासन आणि रेल्वे प्रशासन समन्वयाने काम करीत असून, जखमींच्या उपचारासाठी तातडीने व्यवस्था करण्यात येत आहेत. घटनास्थळी आठ रुग्णवाहिका रवाना करण्यात आल्या आहेत.
सामान्य रुग्णालय तसेच नजीकच्या इतर खाजगी रुग्णालयांना जखमींवर उपचारासाठी सज्ज ठेवण्यात आले आहे. ग्लासकटर, फ्लडलाईट्स इत्यादी आपातकालिन यंत्रणा सुद्धा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. संपूर्ण स्थितीवर आम्ही लक्ष ठेऊन असून, आवश्यक ती सर्व मदत तातडीने पुरविण्यात येत आहे. जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात असल्याबाबत मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
या अपघातामध्ये सात ते आठ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती होती. मात्र, संध्याकाळी मृतांचा आकडा वाढला आहे. मृतांची संख्या १२ वर पोहोचली असल्याचे सांगितले जाते. मृतांची संख्या आणखी वाढण्याची भीती वर्तवली जात आहे. आगीची अफवा पसरल्यानंतर प्रवाशांनी ट्रेनमधून उड्या मारायला सुरूवात केली, तेव्हाच समोरून बंगळुरू एक्सप्रेस जात होती, या एक्सप्रेसखाली काही प्रवासी आले, ज्यात त्यांचा मृत्यू झाला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे प्रशासनाला निर्देश… जळगाव जिल्ह्यात पाचोरा येथे परधाडे रेल्वे स्टेशननजीक रेल्वे अपघातात प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्याबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. अपघाताची घटना कळताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून अपघाताची माहिती घेतली तसेच जखमी प्रवाशांना तातडीची मदत व मोफत वैद्यकीय उपचारांची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले.
आमदार सत्यजित तांबे यांची आपण आता संदर्भात प्रतिक्रिया – जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील पथराडे या गावाजवळ घडलेल्या रेल्वे अपघाताच्या दुर्दैवी घटनेत काही व्यक्तींनी आपले प्राण गमावल्याची अत्यंत दुःखद बातमी समजली. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या अपघातात जखमी झालेले प्रवासी लवकरात लवकर बरे व्हावे, हीच ईश्वरचरणी प्रार्थना! – सत्यजित तांबे, आमदार
जखमींना चांगल्या रुग्णालयात उपचार द्या… जळगाव इथे पाचोरा तालुक्यात पुष्पक एक्स्प्रेस मधील प्रवाशांचा अपघाताचे वृत्त अत्यंत धक्कादायक आहे. आगीच्या भीतीने प्रवाशांनी उड्या मारल्या आणि त्यात नाहक त्यांचा जीव गेला. मृत प्रवाशांच्या कुटुंबियांना शासनाने तात्काळ मदत केली पाहिजे तसेच जखमी प्रवाशांना वेळीच चांगल्या रुग्णालयात उपचार दिले पाहिजे. यातील मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली व जखमी प्रवासी लवकर बरे व्हावेत, ही प्रार्थना..! – बाळासाहेब थोरात, माजी मंत्री.


