अहिल्यानगर दि. २७-
अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती बँकेची नोकर भरती सुरू आहे. आरक्षण डावलून होणाऱ्या जिल्हा बँकेच्या या भरतीला वंचित बहुजन आघाडीने विरोध केला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवेदन देत बँकेची भरती प्रक्रिया थांबविण्याची मागणी करण्यात आली आहे.
रविवारी (२६ जानेवारी) वंचित बहुजन आघाडीच्या प्रवक्त्या उत्कर्षा रूपवते यांच्यासह वंचितच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांची भेट घेत त्यांना या संदर्भातील निवेदन दिले.
जिल्हा सहकारी बँकेच्या भरती प्रक्रियेमध्ये आरक्षणाची तरतूद वगळण्यात आली आहे. वंचित शोषित घटकांवर अन्याय होऊ नये असा आग्रह शिष्टमंडळाने पालकमंत्र्यांकडे धरला. संचालक मंडळाचा कुठल्याही रास्त प्रक्रियेशिवाय आरक्षणाची तरतूद रद्द करणाऱ्या निर्णयाचा यावेळी निषेध नोंदवत संविधानिक मार्गाने जो पर्यंत भरतीची प्रक्रिया राबवली जात नाही, तो पर्यंत भरती प्रक्रिया थांबविण्याची निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
वंचित नेत्या उत्कर्षा रुपवते यांच्या समवेत वंचित बहुजन आघाडीचे अहिल्यानगर दक्षिण जिल्हाध्यक्ष योगेश साठे, शहराध्यक्ष हनीफभाई शेख, शहर महासचिव अमर निरभवने, शहर उपाध्यक्ष प्रवीण ओरे, जिल्हा महासचिव अनिल जाधव, जिल्हा सल्लागार जे. डी. शिरसाठ, भिंगार शहराध्यक्ष राजीव भिंगारदिवे, नगर तालुकाध्यक्ष मारुती पाटोळे, नेवासा तालुकाध्यक्ष पोपट सरोदे, राहुरी तालुकाध्यक्ष संतोष चोळके आदी उपस्थित होते.


