संगमनेर दि. १ –
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या मुंबईतील कार्यक्रमात माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पराभवाचे विश्लेषण करत निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. दरम्यान थोरात यांचा पराभव करून संगमनेरमधून निवडून आलेल्या आमदार अमोल खताळ यांनी राज ठाकरे यांना या संदर्भात आपल्या एक्स अकाउंटवर उत्तर देताना संगमनेरमध्ये आमंत्रित केले आहे.
निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असतानाच ठाकरे यांनी निकालाबाबत व्यक्त केलेली शंका संगमनेरमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे. अनेकांना थोरात यांचा पराभव अनपेक्षित असाच होता. मात्र थोरात यांनी आपल्या चाळीस वर्षाच्या कार्यकाळात या मतदारसंघात केलेली कामे जनतेसमोर असताना देखील थोरात यांनी चाळीस वर्षात काय केले असा प्रश्न उपस्थित करत निवडणूक मैदानात उतरलेल्या खताळ यांनी थोरात यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करत निवडणुकीत थोरात यांचा धक्कादायक पराभव करत विजय मिळवला.
दरम्यान याच विषयावरून दोन दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी थेट थोरात यांचे नाव घेत त्यांच्या पराभवाबद्दल शंका उपस्थित केले. आणि केवळ मीच नव्हे तर सारा महाराष्ट्र प्रश्न उपस्थित करत असल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यानंतर या मतदारसंघातून निवडून आलेले अमोल खताळ यांनी शनिवारी आपल्या एकस अकाउंटवर एक पोस्ट टाकत राज ठाकरे यांना बाळासाहेब थोरात यांच्या पराभवाची खरी कारणे समजून घेण्यासाठी संगमनेरला आमंत्रित करत असल्याचे म्हटले आहे.
https://x.com/amolkhatalpatil/status/1885536216373748025?t=O-Ke-b9adjn5dJhJUkxY1A&s=19
या पोस्टमध्ये खताळ यांनी राज ठाकरे यांना उद्देशून म्हटले आहे की, साहेब, संगमनेरच्या जनतेने पाणीटंचाई, बेरोजगारी, अपूर्ण विकास व जनतेकडे दुर्लक्ष यामुळेच चाळीस वर्षापासून निवडून दिलेल्या बाळासाहेब थोरात यांना नाकारलं आहे. ४० वर्ष आमदार, १७ वर्ष मंत्री असून पण तालुक्यात साधी एमआयडीसी नाही, शेतीला पाणी नाही मग जनतेने मत का द्यावी? राज साहेब मुंबईच्या बाहेर या संगमनेर पहा संगमनेरच्या जनतेला परिवर्तन हवे होते मतांच्या माध्यमातून जनतेने परिवर्तन करून दाखवले हे सत्य तुम्हाला समजेल! बाकी कोणाच्या तरी सांगण्यावरून पराभवाचे विश्लेषण करण्यापेक्षा बाळासाहेब थोरात यांच्या पराभवाची खरी कारणे समजून घेण्यासाठी तुम्हाला मी संगमनेरमध्ये आमंत्रित करतोय, असं म्हटलं आहे.




