विशेष प्रतिनिधी / नवी दिल्ली
दिल्ली विधानसभा निवडणुकीचा अंतिम निकाल समोर आला आहे. गेल्या ३ विधानसभा निवडणुकांमध्ये दिल्लीकरांनी आम आदमी पक्षाला भरभरुन मतदान केलं. पण त्याच दिल्लीकरांनी आता भाजपच्या झोळीत मतांचं दान टाकलं. भाजप आणि आपमध्ये थेट निवडणूक झाली. पण या सगळ्यात खरा गेम काँग्रेसनं केला. २०१५, २०२० आणि आता २०२५, अशा सलग तीन निवडणुकांमध्ये काँग्रेसला दिल्लीत भोपळाही फोडता आलेला नाही. पण या निवडणुकीत त्यांनी अरविंद केजरीवालांच्या आपचं मोठं नुकसान केलं.
दिल्ली विधानसभेत एकूण ७० जागा आहेत. पैकी ४८ जागांवर भाजपनं विजय मिळवला आहे. तर आपने २२ जागांवर विजय नोंदवत एका मतदारसंघात आघाडी राखली आहे. काँग्रेसला एकही जागा मिळालेली नाही. पण किमान १६ जागांवर काँग्रेसमळे आपचा पराभव झाला आहे. त्यामुळे आपच्या सत्तेला सुरुंग लावण्यात काँग्रेसने अप्रत्यक्षपणे हातभार लावला आहे.
२०२० मध्ये झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपला ५३ टक्क्यांहून अधिक मतदान झालं होतं. तर भाजपला ३८.५१ टक्के मतं मिळाली होती. यंदा आपला ४३.६१ टक्के मतं पडली आहेत. तर भाजपला ४५.८८ टक्के मतं मिळाली आहेत. दोन्ही पक्षांना मिळालेल्या मतांमध्ये केवळ २.२७ टक्क्यांचं अंतर आहे. पण त्यामुळे जागांमध्ये पडलेला फरक तब्बल २६ चा आहे.
अडीच टक्के मतदान नेमकं कुठे गेलं? या प्रश्नाचं उत्तर काँग्रेस असं देता येईल. यंदाही काँग्रेसला १० टक्क्यांहून कमी मतं पडली आहेत. पण काँग्रेस वोट कटवा ठरली आहे. गेल्या निवडणुकीत पहिल्या आणि दुसऱ्या पक्षांमध्ये बरंच अंतर होतं. त्यामुळे काँग्रेसला किती मतं मिळाली, याने फरक पडला नव्हता. पण यंदाची परिस्थिती वेगळी होती. अवघ्या २.२७ टक्क्यांमुळे मोठा फरक पडला. काँग्रेसनं ६.३९ टक्के मतं घेत आपला धक्का दिला.
अरविंद केजरीवाल तीनवेळा दिल्लीचे मुख्यमंत्री राहिले. सलग तीनदा ते नवी दिल्ली मतदारसंघातून निवडून आले. पण यंदा भाजपच्या प्रवेश सिंह यांनी त्यांचा ४ हजार मतांनी पराभव केला. तिसऱ्या क्रमाकांवर राहिलेल्या काँग्रेसच्या संदीप दीक्षित यांनी ४ हजार ५०० हून अधिक मतं घेतली. आपमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे नेते असलेल्या मनीष सिसोदियांचा जंगपुरा मतदारसंघात ६७५ मतांनी पराभव झाला. तिथे तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या फरहाद सुरींनी ७ हजाराहून अधिक मतं घेतली.
सोमनाथ भारतींच्या पराभवालाही काँग्रेसचा हातभार लागला. आपचे राष्ट्रीय प्रवक्ते सौरभ भारद्वाज केवळ ३१०० मतांनी हरले. तिथे काँग्रेसचे गर्वित सांघवी ६ हजार ७०० मतं घेऊन तिसऱ्या स्थानी राहिले. अशा जवळपास १७ जागांवर आपला पराभव पाहावा लागला. त्यामुळे दिल्लीत आप आणि काँग्रेसची आघाडी असती, तर चित्र वेगळं दिसलं असतं.
दिल्लीची सत्ता भाजपने पुन्हा एकदा मिळवताना ‘आप’ला सत्तेतून बेदखल केलं आहे. दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया यासारखे दिग्गज नेते पराभूत झाले. त्यांच्या पराभवासाठी काँग्रेसची मते सुद्धा कारणीभूत ठरली आहेत. ज्या १६ जागांवर आपचा पराभव झाला त्यामध्ये काँग्रेसला मिळालेली मतं ही भाजपच्या विजयी मतांपेक्षा जास्त आहेत. त्यामुळे कदाचित हे दोन्ही पक्ष समन्वयाने एकत्रित लढले असते तर भाजपला सत्ता मिळवता आली नसती, असे दिसून येत आहे.
नवी दिल्ली, छत्रपूर, जंगपुरा बादली, त्रिलोकपुरी, ग्रेटर कैलास, नांगलोई, तिमारपूर मालवीय नगर, राजेंद्र नगर, संगम विहार, दिल्ली केंट या विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपच्या विजयी मतांपेक्षा काँग्रेसला मते मिळालेली सर्वाधिक आहे. त्यामुळे कदाचित या जागांवर काँग्रेस आणि आपमध्ये आघाडी असती, तर या जागा आपच्या पदरामध्ये किंवा काँग्रेसच्या पदरात आल्या असत्या हे स्पष्ट होत आहे. त्यामुळे आप आणि काँग्रेस मधील हे वादामुळेच भाजपचा दिल्लीतील विजय सुकर झाला आहे. एक प्रकारे एकमेकांची कपडे फाडण्यातच इंडिया आघाडीच्या नेत्यांचा वेळ जात असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले.
महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये सुद्धा जागावाटपावरून काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये कमालीचा वाद निर्माण झाला होता. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यामध्ये फक्त सत्तेत येण्याचीच औपचारिकता अशा पद्धतीनेच भांडणे सुरू होती. या भांडणाचाच फटका तिन्ही पक्षांना विधानसभा निवडणुकीमध्ये बसला. फक्त झारखंडमध्ये इंडिया आघाडीला सरकार स्थापन करता आलं आहे.
इंडिया आघाडीमधील मतभेद हे भाजपच्या विजयासाठी कारणीभूत ठरत असल्याचे दिसून येत आहे. आज दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर आल्यानंतर जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिलेली प्रतिक्रिया सुद्धा फारच बोलकी असल्याचे दिसून आले. अजून आपसात लढा म्हणत इंडिया आघाडीला टोला दिला. अर्थात, जम्मू आणि काश्मीरमध्ये सत्ता आल्यानंतर अब्दुल्ला यांचा सूर बदलला आहे. त्यानंतर शिवसेना संजय खासदार संजय राऊत यांनी सुद्धा त्यांच्याच सुरात सूर मिसळला. त्यामुळे इंडिया आघाडीतील प्रादेशिक पक्षातील नेत्यांचे मतभेद आणि काँग्रेसचा अहंकार यामध्ये सत्तेचा महामार्ग रखडला गेला आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.
काही दिवसांपूर्वीच ज्येष्ठ काँग्रेस नेते शशी थरुर यांनी आम्ही इंडिया आघाडी म्हणून लोकसभा निवडणुकीत एकत्र होतो, पण आता नाही. आघाडीची स्थापना केल्यापासून ती राज्यांत चालणार नाही, हे स्पष्ट होते. त्याची कार्यप्रणाली राज्यांच्या राजकीय स्वभावावर अवलंबून असेल. त्यामुळे इंडिया आघाडीची शोकांतिका म्हणून वाचू नये, आणि त्याचा आनंदही साजरा करु नये, असे म्हटले होते.

राजधानी दिल्लीत मतमोजणी सुरू झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाने पोस्टल मतमोजणीपासून ट्रेंडमध्ये आघाडी घेतली होती. आम आदमी पक्ष अनेक महत्त्वाच्या जागांवर पिछाडीवर पडत गेला होता. दिल्लीत २७ वर्षांनंतर कमळ फुलले आहेत. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालात सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये भाजपाला मोठी आघाडी मिळाली. तर आम आदमी पक्ष पिछाडीवर गेला आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपला मोठा धक्का बसला आहे. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया आणि माजी मंत्री सत्येंद्र जैन यांचा पराभव जिव्हारी लागणारा ठरला आहे.

मतदारांचा कल मान्य – केजरीवाल
या निकालानंतर दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. जनतेनं दिलेला निकाल आम्हाला मान्य आहे. विजयाबद्दल भाजपाला मी शुभेच्छा देतो. लोकांनी ठेवलेल्या अपेक्षा भाजपा पूर्ण करेल असा विश्वास आहे. जनतेनं मागील १० वर्ष आम्हाला संधी दिली व त्यात आम्ही खूप चांगली कामं केली. शिक्षण, आरोग्य, वीज अशा विविध क्षेत्रात काम करत लोकांना दिलासा दिला. आता विरोधी बाकावर जरी आम्ही बसणार असलो तरी सुद्धा आम्ही जनतेची कामं करत राहणार आहोत. राजकारणात आम्ही जनतेच्या सेवेसाठी आलो आहोत, सत्तेसाठी नाही. या निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी चांगलं काम केलं व त्याबद्दल त्यांना शुभेच्छा देतो, अशी प्रतिक्रिया अरविंद केजरीवाल यांनी निकालानंतर दिली.


