नवी दिल्ली –
नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर शनिवारी रात्री दहा वाजता झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये तब्बल १८ जणांचा मृत्यू झाला असून १० लोक जखमी झाले आहे.
शनिवारी रात्री नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर उत्तर प्रदेश मधील प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभला जाणाऱ्या ट्रेनमध्ये चढण्यासाठी प्लॅटफॉर्म क्रमांक १४, १५ व १६ वर भाविक प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती. यावेळी ही दुर्दैवी दुर्घटना घडली. त्यामुळे महाकुंभला जाण्याची अनेकांची इच्छा अपूर्ण राहिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार या अपघातात तीन मुलांसह १८ जणांचा मृत्यू झाला आहे आणि १० जण जखमी आहेत. महाकुंभला जाणाऱ्या एक्स्प्रेस गाड्या उशीरा धावत असल्याने प्लॅटफॉर्म क्रमांक १४, १५ व १६ वर मोठी गर्दी होती. त्यामुळे एक्स्प्रेस रेल्वे स्थानकावर येताच प्रवाशांची मोठी गर्दी जमा झाली. त्यातून गाडीत चढण्यासाठी चेंगराचेंगरी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
या चेंगराचेंगरीत मृत्यू झालेल्यांना १० लाख, गंभीर जखमी झालेल्यांना अडीच लाख आणि किरकोळ जखमी झालेल्या प्रवाशांना एक लाख रुपयांची मदत केली जाणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलं आहे.
उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये गेल्या महिन्याभरापासून महाकुंभमेळा सुरू असून, दिल्लीतूनही मोठ्या संख्येने लोक महाकुंभात शाही स्नान करण्यासाठी जात आहेत. नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरून महाकुंभासाठी येथून दोन विशेष गाड्या चालवल्या जात आहेत. यामध्ये चढण्यासाठी मोठ्या संख्येने प्रवासी आले होते. यामुळे प्लॅटफॉर्म क्रमांक १४ आणि १५ वर काल रात्री चेंगराचेंगरी झाली. या घटनेत १८ जणांचा मृत्यू झाला तर १० पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. केंद्रीय मंत्री अश्विन वैष्णव यांनी या प्रकरणी ट्विट करत माहिती दिली आहे.
अश्विनी वैष्णव म्हणाले की, “नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील परिस्थिती आता नियंत्रणात आहे. दिल्ली पोलीस आणि आरपीएफ घटनास्थळी पोहोचले आहेत. जखमींना रुग्णालयात नेण्यात आले आहे. गर्दी नियंत्रित करण्यासाठी विशेष गाड्या चालवल्या जात आहेत.”
“नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या दुर्दैवी चेंगराचेंगरीमुळे खूप दुःख झाले आहे. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे, आम्ही त्यांच्याबरोबर आहोत.”, असे वैष्णव म्हणाले.

