नाशिक, दि. २० फेब्रुवारी
कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक केल्याच्या आरोपात राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांना नाशिकच्या जिल्हा न्यायालयाने दोन वर्षाचा कारावास आणि पन्नास हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. तब्बल २९ वर्षांनी या खटल्यचा निकाल लागला आहे.
१९९५ मधील एका प्रकरणात त्यांना ही शिक्षा सुनावण्यात आली. कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक केल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे. या शिक्षेमुळे माणिकराव कोकाटेंच्या मंत्रीपदासह आमदारकीवर टांगती तलवार आली आहे. तर या खटल्यातील अन्य दोन आरोपींना न्यायालयाने कोणत्याही स्वरूपाची शिक्षा ठोठावली नाही. खटल्यात एकूण सहा साक्षीदार तपासण्यात आले.
माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी १९९५ मध्ये सदनिकांच्या घोटाळ्या संबंधाने माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात नाशिक जिल्हा न्यायालयात दावा दाखल केला होता. १९९५ कोकाटे आमदार होते तर दिघोळे हे मंत्री होते. गेल्या अनेक वर्षांपासून दिवाळी आणि कोकाटे यांच्यामध्ये हा वाद सुरू होता.
गुरुवारी, २० फेब्रुवारी रोजी याप्रकरणाची सुनावणी पार पडली. कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूकीच्या प्रकरणावर त्यांना शिक्षा सुनावली आहे. यामुळे मंत्री माणिकराव कोकाटे चांगलेच अडचणीत आले आहेत. या प्रकरणात माणिकराव कोकाटे वरच्या न्यायालयात दाद मागणार असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतू, इथेही त्यांना दिलासा मिळाला नाही तर माणिकराव कोकाटे यांनी आमदारकी धोक्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
असं आहे नेमकं प्रकरण….
कागदपत्र फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप करत माजी मंत्री दिघोळ यांनी कोकाटे यांच्या विरोधात हा दावा दाखल केला होता. कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांनी शासनाकडून ज्या सदनिका मिळतात त्या सदनिका घेतल्या होत्या. त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की आमचे उत्पन्न कमी आहे आणि आम्हाला दुसऱ्या घर नाहीये अशा स्वरूपाची माहिती त्यांनी दिली होती. त्यांना शासनाच्या माध्यमातून त्या सदनिका मिळाल्या. विशेष म्हणजे कोकाटे बंधूंनी किंवा त्यांना मिळालेल्या सदनिकाच घेतल्या नाही तर उर्वरित दोघांना मिळालेली घरी म्हणून लाटली होती. ही बाब अप्पर जिल्हाधिकारी विश्वनाथ भास्कर पाटील यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी या संबंधात तक्रार दाखल केली होती. तर माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनीही यासंबंधी एका याचिकेद्वारे कोकाटे यांच्यावर कागदपत्रात फेरफार व फसवणुकीचा आरोप केला होता.



