
मुंबई, दि. ३ मार्च
विधान परिषदेच्या पाच जागांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. विधान परिषदेतील पाच सदस्य विधानसभा निवडणुकीत निवडून गेल्याने विधान परिषदेच्या पाच जागा रिक्त झाल्या होत्या. विशेष म्हणजे या पाचही जागा महायुतीच्या आहेत.
रिक्त झालेल्या पाच जागेवर कोणाची वर्णी लागते याची आता राजकीय वर्तुळात उत्सुकता लागली आहे.
विधान परिषद निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवाराला १० मार्च ते १७ मार्चपर्यंत अर्ज भरण्यासाठी मुदत आहे. तर २० तारखेला अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. या पाच जागांसाठी २७ मार्चला निवडणूक होईल. यासाठी केंद्रीय निवडणुक आयोगाकडून वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

शिवसेना शिंदे गट एक, अजित पवार गटाचा एक तर भाजपच्या तीन रिक्त जागांवर निवडणूक होणार आहे. महायुतीच्याच पाच आमदारांच्या जागा रिक्त झाल्या असल्याने संबंधित जागांवर महायुतीच्याच उमेदवारांची निवड होईल. असे असले तरी महायुतीकडून मनसेला एक जागा दिली जाण्याचे संकेत मिळत आहे.
https://youtu.be/RzyLCZ7TrdY?si=lBsWG_0lu8OmsPwr
शिवसेना शिंदे गटाचे आमदार आमशा पाडवी, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे आमदार राजेश विटेकर, भाजपचे आमदार प्रवीण दटके, आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार रमेश कराड या पाच आमदारांचा विधानसभा निवडणुकीत विजय झाला होता. या सदस्यांच्या रिक्त जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.


