
संगमनेर –
नाशिकहून पुण्याच्या दिशेने जाणार्या कारची त्याच लेनवरुन येणार्या आयशर टेम्पोशी समोरासमोर धडक झाली. या अपघातात प्राजक्ता गिरीश गिरमे या महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर, त्यांचे पती आणि मुलगाही गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर डोळासणे महामार्ग पोलिसांनी टोल कर्मचार्यांच्या मदतीने अपघातग्रस्तांना रुग्णालयात दाखल केले.
याबाबत डोळासणे महामार्ग पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार रविवारी (दि ९) दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास डोळासणे शिवारातील बांबळे वस्तीजवळ ही घटना घडली. सध्या सिन्नर ते खेड या नाशिक-पुणे महामार्ग कॉक्रीटीकरणाचे काम सुरु आहे. साकूर फाट्यापासून पुण्याच्या दिशेने एकाच लेनवरुन दोन्ही बाजूची वाहतूक वळवण्यात आली आहे.
रविवारी दुपारी गिरीश गिरमे (वय ३५) हे त्यांची पत्नी प्राजक्ता (वय ३०) व मुलगा वेदांत (वय १३ सर्व रा. सासवड, ता. पुरंदर, जि. पुणे) हे सर्व मारुती सियाझ (क्र. एम.एच.१२ एल.पी. ५५५६) मधून नाशिकहून पुण्याकडे जात होते. डोळासणे शिवारात नाशिक लेनवर कॉक्रीटीकरणाचे काम सुरु असल्याने ही लेन पुण्याकडून येणार्या रस्त्याला जोडण्यात आली आहे.
गिरीश गिरमे यांनी डोळासण्याजवळ वळणरस्ता घेत काही अंतर पुढे गेल्यानंतर त्यांनी वाहनासमोर असलेल्या मालट्रकला ओव्हरटेक करुन पुढे जाण्याचा प्रयत्न केला. मात्र दुर्दैवाने त्याचवेळी पुण्याच्या दिशेने भरधाव वेगात येत असलेल्या आयशर कंपनीच्या टेम्पोची (क्र. एच.आर.५५ ए.एन.६६४४) त्यांच्या कारला समोरासमोर धडक दिली. वाहनाचा वेग अधिक असल्याने हा अपघात होताच भरधाव वेगात दोन वाहनांची एकमेकांशी टक्कर झाल्यानंतर कारचा अक्षरशः चेंदा होवून ती रस्ता दुभाजकावर फेकली गेली.

या अपघातात वाहनांच्या धडकेने मोठा आवाज झाला. आसपासच्या नागरिकांनी आणि वाहनचालकांनी मदतीसाठी धाव घेतली. या अपघाताची माहिती डोळासणे महामार्ग पोलिसांना देण्यात आली. हिवरगाव पावसा टोलनाक्याला अपघाताची माहिती मिळताच मदतकार्य सुरु केले.
या भीषण अपघातात चालकाशेजारील सीटवर बसलेल्या प्राजक्ता गिरीश गिरमे यांचा जागीच मृत्यू झाला. तर, वाहन चालवणार्या गिरीश गिरमे यांच्यासह पाठीमागील आसनावर बसलेला त्याचा १३ वर्षीय मुलगा वेदांत गंभीर जखमी झाले. अपघातानंतर महामार्ग पोलिसांनी टोलनाक्यावरील रुग्णवाहिकेतून जखमींना संगमनेरच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. तर, मयत प्राजक्ता गिरमे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला.
या घटनेत एका महिलेचा नाहक बळी गेल्याने परिसरातील नागरिकांमधून मोठी हळहळ व्यक्त होत करत आहे. नाशिक पुणे महामार्गावर वाढणाऱ्या अपघातामुळे निरपराध नागरिकांचा बळी जात आहे. रस्त्याचे काम करणार्या ठेकेदाराचा हाच हलगर्जीपणा गिरमे कुटुंबाच्या अपघाताला कारणीभूत ठरला.


