संगमनेर, दि. १५ मार्च – प्रतिनिधी
चाळीस वर्षाची विकास कामांची परंपरा आणि प्रगती नव्या आमदारांना तीन महिने ही सांभाळता आली नाही. माजी मंत्री थोरात यांनी आपल्या कारकीर्दीत संगमनेर तालुका अतिशय चांगल्या पद्धतीने सांभाळला असल्याने राज्यातील विकसित तालुक्यांमध्ये या तालुक्याचे गणना होते. मात्र अवघ्या तीन महिन्यात पालकमंत्र्यांच्या हातचे बाहुले झालेल्या आमदार अमोल खताळ यांनी आपण पालकमंत्री विखे यांना नव्हे तर संगमनेरकरांना बांधील असल्याचे भान बाळगले पाहिजे. वीज प्रश्नाच्या संदर्भाने ज्यांना साधे नियोजन देखील करता येत नाही त्यांनी माजी मंत्री थोरात यांच्यावर टीका करणे म्हणजे शुद्ध बालिशपणा असल्याचा आरोप काँग्रेसचे शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे यांनी केला आहे. 
प्रसिद्धी पत्रकात दिवटे यांनी म्हटले आहे की, आमदार खताळ यांनी अवघ्या तीन महिन्यात आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. त्यांच्या आजूबाजूला असलेले टवाळखोर, तस्कर आणि खंडणीबहाद्दर आता हा तालुका चालविणार आहेत का? दहशत आणि दादागिरी करून राजकारण करणार आहात का? भास्करराव दुर्वे नाना, दत्ता देशमुख, बी. जे. खताळ पाटील, भाऊसाहेब थोरात या दिवंगत नेत्यांसह बाळासाहेब थोरात यांच्या सुसंस्कृत राजकारणाची परंपरा नव्या आमदारांना सांभाळता येत नसेल तर त्यांनी गप्प बसावे मात्र संगमनेरचा अपमान करू नये.
राज्याच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल कसा लागला हे संपूर्ण देशाला माहित आहे, त्यामुळे तुम्हाला जी आमदारकी मिळाली आहे तिचा आनंद घ्या. संगमनेरवर सूड उगवू नका, विकास कामे बंद पाडू नका आणि महत्त्वाचे म्हणजे टक्केवारीत अडकू नका. दादागिरी करणाऱ्यांना आणि गुंडांना पाठीशी घालू नका.
तालुक्यात वीज प्रश्न गंभीर झाला आहे. पूर्वी जेथे बारा तास पूर्ण दाबाने वीज मिळायची तेथे अवघे चार-पाच तास वीज मिळते. प्रवरेचे पाणी वाहून चालले आहे. रोहित्र वेळेवर मिळत नाही याला फक्त आमदारांचा नाकर्तेपणा कारणीभूत आहे. दादागिरी आणि दमदाटी करून चुकीचे राजकारण करण्याचा प्रयत्न त्यांचा आणि त्यांच्या पिलावळीचा आहे. आढावा बैठकीमध्ये जनतेचे प्रश्न सोडवायचे असतात. त्याला गती द्यायची असते. चालू असलेली कामे बंद करायची नसतात मात्र टक्केवारीच्या आशेने थेट पालकमंत्र्यांना बोलावून खंडणी वसुलीचा कार्यक्रम झाल्याचा आरोप दिवटे यांनी केला आहे.
आढावा बैठक म्हणजे अधिकाऱ्यांवर दादागिरी करून खंडणी उकळण्याचा घृणास्पद प्रकार होता. अनेक अधिकारी खासगीत तालुक्यात वाढलेली टक्केवारी खंडणी आणि दादागिरी याबद्दल चिंता व्यक्त करत आहे. चुकीची माणसं सांभाळून संगमनेर तालुक्याचे नाव बदनाम करण्याचा घाट घातला जातो.

पालकमंत्र्यांनी संगमनेरमध्ये घेतलेली आढावा बैठक ही विकास कामांचा आढावा घेण्यासाठी घेतली नव्हती. ती केवळ विकास कामे बंद पाडण्यासाठी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची राजकीय बैठक होती. विधानसभा निवडणुकीनंतर नाशिक पुणे रेल्वेच्या मार्गात बदल होतो कसा? संगमनेरकरांना न विचारता अपर तहसील निर्माण करण्याचे षडयंत्र कोणाच्या सांगण्यावरून झाले? हे प्रश्न खताळ यांनी बैठकीत पालकमंत्र्यांना विचारायला हवे होते. विजेच्या संदर्भात काय उपाययोजना करणार याचा आराखडा आमदारांनी द्यायला पाहिजे होता. असे प्रश्न उपस्थित करत ज्यांचा मूळ पिंड खंडणीचा आहे या अगोदरही ज्यांनी फक्त लोणीचा खबऱ्या म्हणून काम केले त्यांच्याकडून फारशी अपेक्षा नसली तरी त्यांनी बोलताना आणि वागताना भान बाळगायला हवे असेही दिवटे यांनी म्हटले आहे.


