
मुंबई, दि. २५ मार्च – विशेष प्रतिनिधी
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला. “राज्यात कायद्याचे राज्य राहिले नसून अराजकाची परिस्थिती निर्माण झाली आहे,” असा आरोप त्यांनी केला.
दानवे म्हणाले, “हे सरकार कोत्या मनोवृत्तीने चालवले जात आहे. राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. २०२४ मध्ये राज्यात ७ लाख ८२ हजार ९६० गुन्हे नोंदवले गेले आहेत. अमरावती विभागात दंगलीचे ५६४ गुन्हे घडले आहेत, नागपूरमध्ये ८८ हत्या झाल्या आहेत, छत्रपती संभाजीनगरमध्ये बलात्काराच्या १६६ घटना घडल्या आहेत, आणि पुण्यात ५०६ गुन्हे घडले आहेत.

तुरुंगातील कैद्यांची क्षमता २७ हजार ११४ असताना ४३ हजार कैदी तुरुंगात ठेवले आहेत. राज्यात वर्षभरात जनतेची ५१ हजार कोटींची आर्थिक फसवणूक झाली आहे.” सायबर गुन्ह्यांच्या वाढत्या प्रमाणावरही दानवे यांनी चिंता व्यक्त केली. “सायबर गुन्हे रोखण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलण्याची गरज आहे. सायबर सेल अधिक प्रभावी करण्याची गरज आहे,” असे ते म्हणाले.
दानवे यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कवितेचा संदर्भ देत सरकारवर टीका केली. “छोटे मन से कोई बड़ा नहीं होता, टूटे मन से कोई खड़ा नहीं होता,” असे म्हणत त्यांनी सरकारला धारेवर धरले.
या प्रस्तावावर बोलताना दानवे यांनी युती सरकारचा प्रवास “बाबरीकडून कबरीकडे” गेला आहे, असा टोला लगावला. “या कबरीच्या नादात सरकारची कधी कबर खणली जाईल, हे त्यांना कळणारही नाही,” असे ते म्हणाले. “डबल इंजिन, ट्रिपल इंजिन सरकार असूनही राज्यात गोंधळाची परिस्थिती का आहे?” असा सवालही त्यांनी केला. दानवेंनी विविध मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आणि राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.


