
संगमनेर, दि. २६ मार्च – प्रतिनिधी
परमपूज्य गोवत्स श्री राधाकृष्णजी महाराज यांच्या अमृतवाणीतून १ एप्रिल ते ९ एप्रिल या कालावधीत संगमनेरच्या मालपाणी लॉन्सवर भव्य श्रीराम कथेचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीराम कथा भाविक श्रोत्यांसाठी मोठी पर्वणी ठरणार आहे. या माध्यमातून संगमनेर शहर लवकरच एका भव्य धार्मिक कार्यक्रमाचे साक्षीदार होणार आहे.
१ एप्रिल ते ९ एप्रिल या कालावधीत दररोज दुपारी तीन ते सायंकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान राधाकृष्णजी महाराज यांच्या सुमधुर वाणीतून संगमनेरकरांना श्रीराम कथा श्रवण करण्याचे सौभाग्य मिळणार आहे. या कथेदरम्यानच राधाकृष्णजी महाराज यांच्या रसाळ व गोड वाणीतून भजनाचा देखील आनंद लुटता येणार आहे.
श्रीराम कथा श्रवणाच्या माध्यमातून श्रोत्यांना जीवनातील जगण्याचे सार समजणार असून यातील छोट्या मोठ्या घटनांमधून आपल्याला आयुष्य जगण्याची दिशा मिळणार आहे. श्रीराम कथा ही साक्षात भक्ती-ज्ञान-वैराग्याचे, विद्वत्तेचे आणि मर्यादेचे स्त्रोत आहे. नऊ दिवस चालणारा हा उत्सव सर्वांना संत दर्शन, हर्षोल्लास, समागम व आनंदाच्या एक अलौकिक संगमाकडे घेऊन जाणारा ठरणार आहे.

तत्पूर्वी शुभारंभाच्या दिवशी मंगळवारी (१ एप्रिल) सकाळी नऊ वाजता संगमनेर शहरातून भव्य शोभायात्रा निघणार आहे. त्यानंतर दुपारी श्रीराम कथा महात्म्य याद्वारे श्रीराम कथा सोहळ्यास सुरुवात होईल. या कथेदरम्यानच रामनवमीचा पावन पर्व असल्याने भाविकांसाठी ही मोठी पर्वणी आहे. कथेदरम्यान भव्य राम सीता विवाहोत्सव संपन्न होणार आहे. तसेच श्री राधाकृष्णजी महाराज युवकांसोबत स्वतंत्रपणे संवाद साधणार आहेत.
कथे दरम्यान दुसऱ्या दिवशी (२ एप्रिल) श्री शिव-पार्वती विवाह, तिसऱ्या दिवशी (३ एप्रिल) श्रीराम जन्मोत्सव, चौथ्या दिवशी (४ एप्रिल) बाल लीला व धनुष यज्ञ, पाचव्या दिवशी (५ एप्रिल) श्रीराम-जानकी विवाह, सहाव्या दिवशी (६ एप्रिल) वनवास प्रसंग व केवट संवाद, सातव्या दिवशी (७ एप्रिल) श्रीराम भरत व श्रीराम शबरी भेट, आठव्या दिवशी (८ एप्रिल) हनुमान चरित्र व लंका विजय तर शेवटच्या नवव्या दिवशी (९ एप्रिल) श्रीराम राज्याभिषेक सोहळ्याने या कथेची सांगता होणार आहे.
या राम कथेचे सात सोपान असून यात बालकाण्ड, अयोध्याकाण्ड, अरण्यकाण्ड, किष्किन्धाकाण्ड, सुन्दरकाण्ड, लंकाकाण्ड, उत्तरकाण्ड यांचा समावेश आहे. या श्रीराम कथा श्रवणाचा श्रीराम भक्तांनी मोठ्या संख्येने लाभ घेण्याचे आवाहन श्रीराम कथा आयोजन समितीने केले आहे.


