
महाराष्ट्र संवाद न्यूज, संगमनेर:
संगमनेर शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने आयोजित प्रबोधनात्मक कार्यक्रमात महायुतीच्या काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या आवाजात डीजे लावून व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केल्याने शहरात संतापाची लाट उसळली आहे.
गेल्या ४० वर्षांपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ माघाडे परिवाराच्या माध्यमातून वैचारिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमांची परंपरा जोपासली जात आहे. मात्र, यंदा प्राध्यापक अहिरे यांचे व्याख्यान सुरू असतानाच समोरून डीजेचा कर्कश आवाज करून हा कार्यक्रम उधळून लावण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करण्यात आला. या प्रकारामुळे संगमनेरची सांस्कृतिक आणि सामाजिक एकता धोक्यात आल्याचा आरोप करत राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
तालुक्यात गेल्या काही काळापासून सुरू असलेल्या राजकीय ध्रुवीकरणाचे पडसाद आता महापुरुषांच्या जयंती उत्सवातही उमटू लागले आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे शहरात प्रत्येक सण आणि उत्सवात दोन स्वतंत्र गट आमनेसामने येत असल्याचे चित्र आहे. प्रबोधन सुरू असताना वारंवार अडथळे निर्माण केले जात असल्याने व्यासपीठावर उपस्थित असलेले आमदार सत्यजित तांबे यांनी तीव्र संताप व्यक्त केला. महामानवाच्या विचारांचा जागर सुरू असताना अशा पद्धतीने अडथळे आणणे ही संगमनेरची संस्कृती नाही, असे ठणकावून सांगत त्यांनी पोलीस प्रशासनाच्या हतबलतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आमदार तांबे यांनी थेट माईकवरून पोलिसांना कडक सूचना दिल्यानंतर प्रशासन जागे झाले आणि काही काळासाठी डीजे बंद करण्यात आला.
मात्र, प्रशासकीय अधिकारी घटनास्थळावरून बाजूला होताच पुन्हा डीजे सुरू करण्यात आल्याने तणावात अधिकच भर पडली. या प्रकारामुळे वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या उत्कर्षा रूपवते आणि ८० वर्षीय ज्येष्ठ कार्यकर्त्या कुसुमताई माघाडे यांनी थेट डीजे सुरू असलेल्या ठिकाणी जाऊन कार्यकर्त्यांना जाब विचारला. व्याख्यान सुरू असताना अशा प्रकारे धुडगूस घालणे अत्यंत बेशिस्त आणि निंदनीय असल्याचे सांगत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. यावेळी काही कार्यकर्त्यांनी ज्येष्ठ महिलांशीही उद्धट वर्तन केल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे आंबेडकरी अनुयायांमध्ये प्रचंड नाराजी असून, साध्या वेशातील पोलिसांनी या गोंधळाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप प्राध्यापक डॉ. शशिकांत माघाडे यांनी केला आहे.
संगमनेरमध्ये यापूर्वी गणेशोत्सव आणि इतर सणांमध्येही अशाच प्रकारे राजकीय चढाओढ आणि फलकबाजीवरून वाद झाले होते. मात्र, थेट महापुरुषांच्या जयंती कार्यक्रमात प्रबोधन थांबवून डीजे लावण्यापर्यंत या विकृत प्रवृत्तींची मजल गेल्याने सर्वच स्तरांतून निषेध होत आहे.
राजकीय दबावाखाली प्रशासन हतबल झाल्याचे या घटनेने पुन्हा एकदा अधोरेखित केले असून, भरचौकात पोलीस बंदोबस्त असतानाही असा प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. संगमनेरची शांतता आणि सामाजिक सलोखा टिकवून ठेवण्यासाठी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी भीम सैनिकांनी आणि सुज्ञ नागरिकांनी केली आहे.






