
अहमदनगर, दि. ३० मार्च –
ग्रामीण भागाची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एस.टी. महामंडळाने प्रवाशांना खासगी वाहतुकीपेक्षा अधिक दर्जेदार सुविधा द्याव्यात, असे आवाहन जलसंपदा मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
जिल्ह्यातील विविध आगारांसाठी नव्याने मिळालेल्या ४५ एस.टी. बसेसचे लोकार्पण आणि अहमदनगर-पुणे विनावाहक बस सेवेचा शुभारंभ पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते तारकपूर बस स्थानक येथे करण्यात आला.
कार्यक्रमाला आमदार शिवाजी कर्डिले, आमदार संग्राम जगताप, अभय आगरकर, बाबू टायरवाले, विनायकराव देशमुख, श्रीमती दानवे, आगार व्यवस्थापक अभिजीत चौधरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री विखे पाटील यांनी सांगितले की, एस.टी. बस ग्रामीण भागाची जीवनवाहिनी आहे. पूर्वी गावात एस.टी. बस येणे ही मोठी मानाची बाब मानली जात होती. आजच्या आधुनिक काळात वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल झाले आहेत. खासगी वाहतुकीच्या स्पर्धेत सेवा देण्यासाठी एस.टी. महामंडळाच्या ताफ्यात अनेक आधुनिक बस दाखल झाल्या आहेत. या माध्यमातून महामंडळाने प्रवाशांना अधिक दर्जेदार सेवा देऊन त्यांना एस.टी.कडे आकर्षित करावे.
जिल्ह्यातील एस.टी. बस स्थानकांचे सुशोभीकरण आणि बस स्थानके व बसेसची नियमित स्वच्छता याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. एस.टी. स्थानकांच्या सुशोभीकरणासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले.
कार्यक्रमाला सहाय्यक यंत्र अभियंता महेश कासार, शेवगावचे आगार व्यवस्थापक अमोल कोतकर, भांडार अधिकारी संकेत राजहंस, स्थानक प्रमुख अविनाश कलापुरे यांच्यासह नागरिक उपस्थित होते.
पालकमंत्र्यांचा बसमधून प्रवास… एस.टी. बसच्या लोकार्पण कार्यक्रमानंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी एस.टी. बसमधून प्रवास करून प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सुविधांची माहिती घेतली.


