
संगमनेर, दि. २ एप्रिल – प्रतिनिधी
संगमनेर तालुक्याच्या पठार आणि पश्चिम भागात अचानक आलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या गंभीर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांवर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. त्यामुळे शासनाने तातडीने या भागातील नुकसानीचे पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत करावी, अशी मागणी माजी महसूल आणि कृषीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
हिवरगाव पठार, निमज, नांदुरी दुमाला, सावरगाव तळ, चंदनापुरी मिर्झापूर, धांदरफळ खुर्द या गावांना बुधवारी झालेल्या या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे.

अचानक आलेल्या या पावसामुळे डोंगर भागातून पाणी वेगाने खाली आले आणि शेतात साचले. अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचे दिसत होते. शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने लावलेली कांदा, उन्हाळी बाजरी, गहू, डाळिंब यांसारखी पिके पूर्णपणे खराब झाली आहेत. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास या अवकाळी पावसाने हिरावून घेतला आहे.
बाळासाहेब थोरात म्हणाले की, शेतकरी खूप कष्टाने पिके घेतात. त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. या परिस्थितीत अवकाळी पावसाने त्यांचे मोठे नुकसान केले आहे. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांना त्वरित मदत देणे गरजेचे आहे. बाळासाहेब थोरात यांनी केलेल्या या मागणीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.


