महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर
जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या माध्यमातून निळवंडे धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यातून २० एप्रिलपासून पाणी सोडले जाणार आहे. तालुक्यातील पाणीटंचाई लक्षात घेता, निळवंडे कालव्याच्या आवर्तनाच्या काळात वीज पुरवठा खंडित होऊ नये, असे स्पष्ट निर्देश आमदार अमोल खताळ यांनी महावितरण अधिकाऱ्यांना दिले.

पाणीटंचाई आढावा बैठकीत शेतकऱ्यांनी वीज पुरवठ्याबाबत अनेक तक्रारी आमदार खताळ यांच्याकडे मांडल्या होत्या. या पार्श्वभूमीवर महावितरण कार्यालयात आमदार खताळ यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. या बैठकीस अधीक्षक अभियंता रमेश पवार, कार्यकारी अभियंता अनिल थोरात, उपअभियंता धनंजय खैरनार, प्रेमकुमार पाटील, सुनील अहिरे यांच्यासह तालुक्यातील वीज उपकेंद्रांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
आमदार खताळ म्हणाले की, निळवंडे धरणातून तीन ते चार दिवसात डाव्या व उजव्या कालव्यांना उन्हाळी आवर्तन सुरू होत आहे. या काळात शेतकऱ्यांचा वीज पुरवठा कोणत्याही परिस्थितीत खंडित होऊ नये, याची दक्षता सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घ्यावी. तसेच, ग्रामीण भागातील अनेक रोहित्रांवर अतिरिक्त भार येत असल्याने ते नादुरुस्त होत आहेत. त्यामुळे ज्या रोहित्रांवर अतिरिक्त भार आहे, तो कमी करण्यासाठी काय उपाययोजना करणार आहात, याचा सविस्तर अहवाल तातडीने सादर करा, असे निर्देश त्यांनी दिले.
महावितरण कार्यालयात येणाऱ्या ग्राहकांना अधिकारी व कर्मचारी उद्धट वागणूक देत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे कार्यालयात तक्रार घेऊन येणाऱ्या प्रत्येक नागरिकाशी सौजन्याने बोला आणि त्यांची अडचण समजून घ्या, असे आवाहनही आमदार खताळ यांनी केले.

महावितरण इमारतीसाठी निधी उपलब्ध करून देणार…
कार्यकारी अभियंता व उपअभियंता यांचे कार्यालय वेगवेगळ्या ठिकाणी असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. ही गैरसोय टाळण्यासाठी दोन्ही कार्यालये एकाच छताखाली असावीत. यासाठी महावितरणच्या जागेत नवीन इमारत उभारण्याचा प्रस्ताव तातडीने वरिष्ठ कार्यालयाला पाठवा. यासाठी आपण स्वतः शासन दरबारी पाठपुरावा करू, असे आश्वासन आमदार खताळ यांनी दिले.



