महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर
संगमनेर तालुक्यातील सावरगाव घुले येथील बेलसोंडा वाडीजवळ पाण्याच्या टँकरचा टायर फुटल्याने तो सुमारे २०० फूट खोल दरीत कोसळला. या दुर्घटनेत तुकाराम गोविंद घुले (वय ५०) या शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर त्यांच्यासोबत असलेले सिताराम गणपत घुले हे गंभीर जखमी झाले आहेत. ही हृदयद्रावक घटना आज (मंगळवार, २२ एप्रिल) घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, तुकाराम घुले आणि सिताराम घुले हे दोघेही बेलसोंडा फाट्यावरून बेलसोंडा वस्तीकडे ट्रॅक्टरद्वारे पाणी घेऊन जात होते. दरम्यान, अचानक ट्रॅक्टरचा टायर फुटल्याने चालकाचा ताबा सुटला आणि ट्रॅक्टर थेट २०० फूट खोल दरीत कोसळला.
ट्रॅक्टर दरीत कोसळल्याचा मोठा आवाज ऐकून वस्तीतील ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली. खोल दरीत कोसळलेल्या ट्रॅक्टरमधील तुकाराम घुले यांचा मृतदेह ग्रामस्थांनी झोळीच्या साहाय्याने बाहेर काढला. तर गंभीर जखमी झालेल्या सिताराम घुले यांना तातडीने संगमनेर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

घटनेची माहिती मिळताच घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास पुजारी आणि पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद गाडेकर यांनी तत्काळ बेलसोंडा वस्ती गाठून घटनेचा पंचनामा केला. या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
या घटनेच्या निमित्ताने पठार भागातील रस्त्यांची दयनीय अवस्था पुन्हा एकदा समोर आली आहे. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही वाड्या-वस्त्यांवर जाणारे रस्ते अत्यंत खराब असल्याने येथील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यातच उन्हाळ्यामुळे पाण्याची तीव्र टंचाई जाणवत असून, पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. ‘पाणी हेच जीवन’ असले तरी पाण्याच्या शोधात एका शेतकऱ्याचा अशा प्रकारे दुर्दैवी मृत्यू झाल्याने ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
गावातील डॉ. जवरे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष जालिंदर घुले, माजी सरपंच बाबाजी घुले, राजेंद्र घुले, राहुल घुले, गावचे उपसरपंच नामदेव घुले आणि ग्रामसेवक प्रमोद जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन मदत कार्यात सहभाग घेतला. तुकाराम गोविंद घुले यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण परिसरात शोक आणि दुःख पसरले आहे.


