
संगमनेर – प्रतिनिधी
संगमनेर तालुक्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून झालेल्या अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यासह आलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिके आणि घरांचे मोठे नुकसान झाले असून, याचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश आमदार अमोल खताळ यांनी महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.
खरीप हंगामाच्या पूर्वतयारीत व्यस्त असलेल्या संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना अचानक आलेल्या या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी गारपीट झाली, तर काही भागांमध्ये ढगफुटीसारखा पाऊस झाला, ज्यामुळे शेतात पाणी साचले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांनी काढलेला कांदा, भाजीपाला, फळपिके आणि जनावरांसाठी असलेला चारा यांचे मोठे नुकसान झाले आहे. यासोबतच, वादळामुळे अनेक घरांवरील पत्रे उडाले आहेत, तर काही घरांची पडझड झाली आहे. त्यामुळे अनेक कुटुंब उघड्यावर आली आहेत.
हा मान्सूनपूर्व पाऊस शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरण्याऐवजी नुकसानकारक ठरला आहे. याची दखल घेत आमदार खताळ यांनी तातडीने नुकसानग्रस्त भागातील शेतपिकांचे, घरांचे आणि गोठ्यांचे पंचनामे सुरू करण्याचे निर्देश महसूल आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.


