संगमनेर – प्रतिनिधी
नगरपरिषद आणि नगरपंचायत क्षेत्रातील थकलेल्या मालमत्ता करावरील शास्तीमुळे त्रस्त असलेल्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. आमदार अमोल खताळ यांच्या पाठपुराव्यामुळे राज्य शासनाने ‘अभय योजना’ लागू केली आहे. या निर्णयामुळे राज्यातील लाखो करदात्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

अनेक वर्षांपासून नगरपरिषद आणि नगरपंचायत क्षेत्रातील नागरिक थकीत मालमत्ता करावरील शास्तीच्या ओझ्याखाली दबले होते. आमदार खताळ यांनी नागरिकांची ही समस्या शासनाकडे प्रभावीपणे मांडली. त्यांनी वेळोवेळी संबंधित मंत्री आणि अधिकाऱ्यांकडे निवेदने सादर करून यावर तोडगा काढण्याची मागणी केली होती. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शास्ती माफीसाठी ‘अभय योजना’ मंजूर करण्यात आली आहे.
या योजनेच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ च्या कलम १५० अ (१) मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. त्यानुसार, नगरपरिषदा आणि नगरपंचायतींनी शास्ती माफीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर करायचे आहेत. जिल्हाधिकारी ५०% पर्यंतच्या माफीवर ३० दिवसांच्या आत निर्णय घेतील आणि त्यांचा निर्णय अंतिम असेल. ५०% पेक्षा जास्त माफीच्या प्रस्तावांना शासनाची मंजुरी घ्यावी लागणार आहे. या योजनेमुळे नगरपरिषदांच्या कर वसुलीत वाढ होईल आणि नागरिकांनाही आर्थिक दिलासा मिळेल. या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल खताळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार व्यक्त केले आहेत.

४० वर्षांतील प्रलंबित प्रश्न १०० दिवसांत मार्गी!… संगमनेर नगरपालिकेवर मागील ४० वर्षांपासून एकाच घराण्याची सत्ता होती. त्यांच्या काळात नागरिकांवर अन्यायकारक शास्ती कर लादला गेला, परंतु तो माफ करण्यासाठी कोणतेही ठोस प्रयत्न झाले नाहीत. मात्र, विद्यमान सरकार सत्तेत आल्यानंतर केवळ १०० दिवसांतच मालमत्ता करावरील शास्ती माफीचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला असल्याचे आमदार खताळ यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून देण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
संगमनेर शहरातील नागरिकांवर अनेक वर्षांपासून अन्यायकारक शास्ती आकारली जात होती. यामुळे नागरिकांवर मोठा आर्थिक भार येत होता. ही बाब लक्षात घेऊन आम्ही पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी पत्रव्यवहार केला होता. आमदार झाल्यानंतर मी स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून हा कर माफ करण्याची विनंती केली होती. आज शासनाने हा निर्णय घेतल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. शासनाच्या या सकारात्मक भूमिकेमुळे लाखो कुटुंबांना मोठा आधार मिळणार आहे. नागरिकांनी या अभय योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. – अमोल खताळ, आमदार.



