
संगमनेर – प्रतिनिधी
संगमनेर नगरपरिषद हद्दीतील मालमत्ताधारकांवरील शास्तीकर माफीच्या निर्णयावरून आता स्थानिक राजकारण तापले आहे. माजी उपनगराध्यक्ष नितीन अभंग यांनी नव्याने निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींवर अपुऱ्या माहितीच्या आधारे जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप केला आहे. तर, आमदार सत्यजीत तांबे हे शास्तीकर माफीसाठी सातत्याने पाठपुरावा करत असल्याचे त्यांनी ठळकपणे सांगितले.
या संदर्भातील प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, संगमनेर शहरातील नागरिकांनी घरपट्टी वेळेत न भरल्यास आकारण्यात येणारा २% शास्तीकर आणि अनाधिकृत बांधकामांवरील शास्तीकर माफ करावा, ही संगमनेरमधील नागरिकांची प्रमुख मागणी आहे. आमदार सत्यजीत तांबे यांनी या मागणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला असून, विधान परिषदेतही हा मुद्दा उचलून धरल्याचे तसेच संगमनेर नगरपरिषदेनेही शास्तीकर माफीसाठी वेळोवेळी ठराव करून ते जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केले आहेत, असे अभंग यांनी नमूद केले.
नव्याने आलेल्या शासन निर्णयानुसार, २% शास्तीकरापैकी ५०% रक्कम माफ करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत, तर १००% माफीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाकडे प्रस्ताव सादर करावा असे म्हटले आहे. मात्र, अनाधिकृत बांधकामांवरील शास्तीकर अजूनही कोणत्याही प्रमाणात कमी करण्यात आलेला नाही. हा निर्णय अपूर्ण असून, याच अपुऱ्या माहितीचा आधार घेत नवीन लोकप्रतिनिधी जनतेची दिशाभूल करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे.

प्रशासकीय निष्क्रियतेचा फटका आणि सत्यजीत तांबे यांचा पाठपुरावा – गेल्या साडेतीन वर्षांपासून नगरपालिकेत प्रशासक राजवट असून, हे प्रशासन महायुतीच्या प्रभावाखाली काम करत असल्याचा दावा अभंग यांनी केला आहे. यामुळे शहरातील अनेक मालमत्ताधारकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. संपूर्ण शास्तीकर माफ व्हावा यासाठी आमदार सत्यजीत तांबे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सतत पाठपुरावा केल्यानेच शासनाने हा अध्यादेश काढला असल्याचे अभंग यांनी सांगितले. उर्वरित निर्णयांसाठीही तांबे प्रयत्नशील असून, संगमनेरमध्ये ‘अपघाताने’ झालेले लोकप्रतिनिधी चुकीच्या बातम्या देऊन जनतेची दिशाभूल करत असल्याची टीका अभंग यांनी केली.
‘तुमचे योगदान काय?’ – अभंग यांचा सवाल…
संगमनेर शहरात अनेक वैभवशाली इमारती, सुंदर गार्डन्स, उत्तम रस्ते, सुरक्षित आणि बंधुभावाचे वातावरण, स्वच्छ व मुबलक पिण्याचे पाणी, बंदिस्त गटारे, सुरक्षित व सांस्कृतिक वातावरण अशा विविध सुविधा निर्माण झाल्या आहेत. मोठी बाजारपेठ आणि आर्थिक उलाढाल असलेल्या संगमनेर शहरातील जनतेचा येथील नेतृत्वावर मोठा विश्वास आहे, असे सांगत माजी उपनगराध्यक्ष नितीन अभंग यांनी नव्या लोकप्रतिनिधींच्या योगदानावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.



