संगमनेर – प्रतिनिधी
पुणे-नाशिक महामार्गावरील चंदनापुरी घाटात सुरू असलेल्या काँक्रिटीकरणाच्या कामामुळे अपघातांचे प्रमाण लक्षणीय वाढले असून, यामुळे अनेक निष्पाप नागरिकांचा बळी गेला आहे. यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करत युवक काँग्रेसने प्रशासनाला निवेदन दिले असून, २३ मे रोजी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. युवक काँग्रेसच्या अध्यक्षा, कॅन्सर तज्ञ डॉ. जयश्री थोरात यांनी या मार्गावरील वाढत्या अपघातांवर चिंता व्यक्त केली आहे.

माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नातून त्यांच्या कार्यकाळात नाशिक-पुणे महामार्गाचे चौपदरीकरण यापूर्वीच पूर्ण झाले होते. आता नव्याने सुरू असलेल्या काँक्रिटीकरणाच्या कामामुळे एकेरी वाहतूक सुरू आहे, यामुळे चंदनापुरी घाटात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. जयश्री थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुका युवक काँग्रेस आणि चंदनापुरी ग्रामस्थांनी प्रांताधिकारी व पोलीस प्रशासनाला या कामाची तातडीने पूर्तता करण्यासाठी निवेदन दिले आहे.
यावेळी सरपंच भाऊराव राहणे, कारखान्याचे संचालक विजय राहणे, अंकुश ताजने, भाऊसाहेब सातपुते, रमेश गफले, विजय पवार, प्रथमेश बालोडे, शरद पावबाके, दीपक पाळंदे, अर्जुन घोडे, दीपक शिंदे, समीर शिंदे, तुषार काकड, किरण खुळे, वैष्णव मुर्तडक, शहाबाद शेख, तुषार गवांदे, रोशन गोफने, विशाल वैराळ, ईश्वर फापाळे यांच्यासह अनेक ग्रामस्थ व पदाधिकारी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, चंदनापुरी घाटातील काँक्रिटीकरणाचे काम अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे. त्यामुळे वाहतुकीची मोठी गैरसोय होत असून, विशेषतः तीव्र उतारांमुळे मागील काही महिन्यांत येथे अनेक गंभीर अपघात झाले आहेत, यात अनेकांना जीव गमवावा लागला आहे. ग्रामस्थ आणि कार्यकर्त्यांनी टोल प्रशासनाला वारंवार विनंती करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.
बाळासाहेब थोरात यांनी तालुक्याच्या विकासासाठी दहा वर्षांपूर्वीच नाशिक-पुणे महामार्गाचे चौपदरीकरण पूर्ण केले होते. मात्र, आता सुरू असलेले काँक्रिटीकरण काम अनेक दिवसांपासून रखडले आहे. कामातील या दिरंगाईमुळे संतप्त ग्रामस्थांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे.

या पार्श्वभूमीवर, युवक काँग्रेसने प्रशासनासोबत तातडीने चर्चा घडवून आणण्याची मागणी केली आहे. जर यावर त्वरित मार्ग काढला नाही, तर शुक्रवारी, (२३ मे) सकाळी ९:३० वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा चंदनापुरी ग्रामस्थ व युवक काँग्रेसने दिला असून या आंदोलनाची संपूर्ण जबाबदारी पोलीस प्रशासन व तालुका प्रशासनाची राहील. – भाऊराव रहाणे, सरपंच.
अपघातांचे वाढते प्रमाण दुर्दैवी… पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५० हा वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. यावरील काँक्रिटीकरणामुळे एकेरी वाहतूक सुरू असल्याने सर्वांची गैरसोय होत आहे. तीव्र उतार आणि जास्त वाहतूक यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून, अनेक नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. टोल प्रशासन आणि तालुका प्रशासनाने यावर तातडीने बैठक बोलावून मार्ग काढावा. – डॉ. जयश्री थोरात.



