
संगमनेर, प्रतिनिधी
संगमनेर शहर आणि तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने खंडित होणारा वीजपुरवठा, वारंवार होणारे व्होल्टेजचे चढ-उतार आणि विजेचे झटके यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या प्रकारांमुळे त्रस्त झालेल्या संगमनेरच्या संभाजी ब्रिगेडने तात्काळ वीजपुरवठ्यात सुधारणा करण्याची आणि कायद्यानुसार नागरिकांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. या संदर्भात संभाजी ब्रिगेडने वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.
संभाजी ब्रिगेडने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आम्ही संगमनेर येथील सर्व नागरिकांचे प्रतिनिधी म्हणून हे निवेदन सादर करत आहोत. गेल्या काही महिन्यांपासून वीज पुरवठ्यात वारंवार येणाऱ्या अडचणींमुळे, विशेषतः फेज जाणे, कमी किंवा जास्त व्होल्टेज यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण, वृद्धांचे आरोग्य, व्यापाऱ्यांचे व्यवहार आणि सर्वसामान्यांचे जीवनमान यावर तीव्र परिणाम झाला आहे.

विजेअभावी पंखे आणि दिवे बंद राहत असल्याने उष्णतेमुळे नागरिक हैराण आहेत. पंप न चालल्यामुळे पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे, तर फ्रीज, टीव्ही, कॉम्प्युटर, मोबाईल चार्जर यांसारखी इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरणे अशक्य झाले असून, अनेक उपकरणांचे नुकसान झाले आहे. नागरिकांना मोठा आर्थिक फटका बसला असून, व्यापाऱ्यांचे आणि ग्राहकांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे, कारण अनेक व्यवसाय विजेवर अवलंबून आहेत. लहान मुले आणि वृद्धांना विजेच्या अनियमित पुरवठ्यामुळे त्रास सहन करावा लागतो.
संभाजी ब्रिगेडने वीज कायदा 2003 (Electricity Act, 2003) आणि MERC (Maharashtra Electricity Regulatory Commission) च्या “Standards of Performance” नियमावलीचा हवाला देत नुकसान भरपाईची मागणी केली आहे. निवेदनात नमूद केले आहे की, वीज कायदा 2003 मधील कलम 57 (1) व 57(2) नुसार, सेवा कार्यक्षमतेची अट पाळली नाही तर ग्राहकास भरपाई देणे बंधनकारक आहे, तसेच कलम 59 मध्ये विलंब किंवा दुर्लक्ष केल्यास आर्थिक भरपाई देण्याची तरतूद आहे. याशिवाय, MERC च्या नियमावलीनुसार, कमी व्होल्टेज किंवा फेज गेलेली समस्या 4-12 तासात सोडवणे आवश्यक आहे आणि जर वेळेत सेवा न दिल्यास ग्राहकास दररोज 50-100 रुपये भरपाईची तरतूद आहे.
या सर्व बाबींचा विचार करता, संभाजी ब्रिगेडने वीज वितरण कंपनीकडे तात्काळ वीजपुरवठा सुरळीत करण्याची, नागरिकांनी केलेल्या तक्रारींवर लेखी उत्तर देण्याची, MERC च्या नियमानुसार सर्व पात्र ग्राहकांना नुकसान भरपाई देण्याची आणि पुढील काळात ही समस्या पुन्हा उद्भवणार नाही याची लेखी हमी देण्याची मागणी केली आहे. निवेदनावर संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष राम अरगडे यांच्यासह आदित्य रुपवते, विशाल वैराळ, विकी पवार, ओम टोरपे, यश गायकवाड, नवनाथ सदगीर, साजीद बेग, ओम वाघमारे आदींच्या सह्या व नावे आहेत. या मागण्या वेळेत पूर्ण न झाल्यास नागरिकांतर्फे तीव्र आंदोलनाचा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला आहे.


