
संगमनेर –
अहिल्यानगर जिल्ह्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी संगमनेर शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी ठोस पाऊले उचलण्याचे आश्वासन दिले आहे. येत्या १५ जूनपर्यंत शहरातील सिग्नल पूर्ववत सुरू होतील, अशी माहिती त्यांनी दिली. तसेच, बंद पडलेली वाहतूक शाखा पुन्हा सुरू करण्याबाबत योग्य ती कार्यवाही केली जाईल, असेही ते म्हणाले.
शनिवारी (२४ मे रोजी) अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षकपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर दुसऱ्याच दिवशी जम्मू-काश्मीरमधील तिसवाड सेक्टर येथे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत शहीद झालेले अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा गावचे सुपुत्र, जवान संदीप पांडुरंग गायकर (वय ३२) यांच्यावर आज त्यांच्या मूळगावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. या अंत्यसंस्कारासाठी ते उपस्थित होते. या निमित्ताने घार्गे यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्याला भेट दिली.

यावेळी त्यांच्यासोबत श्रीरामपूर विभागाचे अपर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्गे, संगमनेर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे, शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख, तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देवीदास ढुमणे आणि संगमनेर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे उपस्थित होते.
वाहतूक शाखेचे पुनरुज्जीवन आणि सिग्नल यंत्रणा… संगमनेरमध्ये यापूर्वी स्वतंत्र वाहतूक शाखा कार्यरत होती, मात्र ती बंद झाल्याने शहरात वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे. यावर बोलताना एसपी घार्गे म्हणाले की, वाहतूक शाखा बंद करण्यामागची कारणे पडताळून पाहिली जातील आणि या समस्येचे निराकरण नक्कीच केले जाईल.
मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी सांगितले की, काही वर्षांपूर्वी बसवलेले ट्रॅफिक लाईट्स पुन्हा कधीच उपयोगात आले नाहीत. यावर एसपी घार्गे यांनी पोलीस निरीक्षक देशमुख यांना सूचना केली की, मुख्याधिकारी कोकरे यांच्यासोबत तातडीने सर्वेक्षण करून ट्रॅफिक लाईट्स पुन्हा सुरू करण्यासंदर्भात उपाययोजना कराव्यात.
कमी मनुष्यबळात वाहतूक नियमन… ट्रॅफिक सिग्नल सुरू झाल्यामुळे कमी पोलीस मनुष्यबळात वाहतुकीचे नियमन करणे शक्य होईल, असे मत एसपी घार्गे यांनी व्यक्त केले. सुरुवातीच्या टप्प्यात शहरातील दोन ते तीन मुख्य चौकांत ट्रॅफिक सिग्नल सुरू केले जातील, अशी माहिती त्यांनी दिली. यामुळे संगमनेरकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे.



