
अहिल्यानगर – महाराष्ट्र संवाद न्यूज
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा पदभार आनंद भंडारी यांनी सोमवारी स्वीकारला. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात अमरावती येथे जिल्हाधिकारी म्हणून बदली झालेले मावळते मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांना निरोप देण्यात आला.
यावेळी बोलताना येरेकर म्हणाले, आई-वडिलांमुळे लहानपणापासूनच कष्ट करण्याची आणि गुणवत्तेची सवय लागली. गडचिरोली ते अमरावती व्हाया अहिल्यानगर हा प्रवास माझ्यासाठी निश्चितच मार्गदर्शक ठरणार आहे. अनेक अधिकारी आणि विविध विभागांसोबत काम करताना जिल्हा परिषद या संस्थेची प्रतिष्ठा वाढवण्याचा मी नेहमीच प्रयत्न केला. येथील विविध उपक्रम आणि प्रगतीचा मला अभिमान आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांमध्ये जिल्ह्याला अग्रेसर ठेवण्यासाठी प्रत्येक अधिकारी, कर्मचारी आणि सहकारी संस्थांचे सतत सहकार्य लाभले. नगर जिल्ह्याने मला घडवले आणि खूप प्रेमही दिले.

नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी भंडारी यांनी येरेकर यांचे कौतुक करताना म्हटले की, कमी कालावधीत येरेकर यांनी उत्कृष्ट प्रशासकीय अनुभव मिळवला आहे. राज्यातील मोजक्या कार्यक्षम आणि कर्तृत्ववान अधिकाऱ्यांमध्ये त्यांचे नाव घेतले जाते. अमरावती जिल्हाधिकारीपदीही ते निश्चितच सर्वोत्कृष्ट काम करून बहुमान प्राप्त करतील.
या कार्यक्रमाला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लंगोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके, मुख्य लेखा वित्त अधिकारी शैलेश मोरे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) अशोक कडूस, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) भास्कर पाटील, समाज कल्याण अधिकारी देविदास कोकाटे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. यावेळी विविध कर्मचारी संस्था संघटनांच्यावतीने येरेकर आणि भंडारी यांचा सत्कार करण्यात आला. राहुल शेळके यांनी प्रास्ताविक केले, तर जयश्री कार्ले, नानासाहेब रोहकले, संजय कळमकर, डॉ. दशरथ दिघे, गायसमुद्रे, दशरथ शिंदे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.


