
संगमनेर, प्रतिनिधी –
राज्यात गोवंश हत्या बंदी असतानाही सर्रासपणे गोवंश कत्तलखाने सुरु असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. संगमनेर शहर पोलिसांनी बेकायदेशीर कत्तलखान्यांवर धडक कारवाई करत ७३ गोवंश जनावरांची कत्तलीतून सुटका केली आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल ३२ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या सतरा गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बकरी ईद सणाचे औचित्य साधून अवैध गोमांसाची खरेदी-विक्री व कत्तलीच्या घटना वाढण्याची शक्यता होती. या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी कत्तलखान्यांवर विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या पथकाने धडक कारवाईची योजना आखली.

काही ठिकाणी अवैध कत्तलखाने सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, २ जून ते ७ जून दरम्यान वेगवेगळ्या ठिकाणी पथकांनी छापेमारी केली. पोलिसांनी अचानकपणे टाकलेल्या या छाप्यात, ७३ गोवंश जनावरांची कत्तलीतून सुटका करण्यात आली. कारवाई दरम्यान पकडण्यात आलेली गोवंश जनावरे संगमनेर येथील जीवदया गोशाळेत पाठवण्यात आली आहेत. तर महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यानुसार १७ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब लोखंडे, पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग, पोलीस उपनिरीक्षक रमेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक इम्रान खान, पोलीस कॉन्स्टेबल विशाल कर्पे, हरिश्चंद्र बांडे, आत्माराम पवार, रोहिदास शिरसाठ, अजित कुऱ्हे, संतोष बाचकर, पोलीस उपअधीक्षकांच्या पथकातील पोलीस नाईक राहुल डोके व पोलीस कॉन्स्टेबल राहुल सारबंदे यांच्यासह अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेतील कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.


