संगमनेर, प्रतिनिधी:
संत निवृत्तीनाथ महाराजांच्या आषाढी वारीनिमित्त पंढरपूरकडे जाणाऱ्या पालखीतील वारकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी आमदार अमोल खताळ यांनी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना सक्त सूचना दिल्या आहेत. पारेगाव बुद्रुक येथे पालखीचा मुक्काम असतो आणि यावर्षी वारकऱ्यांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे.

आमदार खताळ यांनी पारेगाव येथे ग्रामस्थ आणि अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन तयारीचा आढावा घेतला. गेल्या वर्षी पावसाने वारकऱ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली होती, त्यामुळे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हाधिकारी व अन्य विभागांना गंभीरपणे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर, आमदार खताळ यांनी यंदा प्रथमच वारकऱ्यांसाठी तीन वॉटरप्रूफ मंडपांची उभारणी करण्यात येणार असल्याचे सांगितले. यासाठी महायुती सरकारने ५ लाख रुपये, ग्रामपंचायतीसाठी २ लाख रुपये आणि २५० शौचालये व स्नानगृहांसाठी २०० युनिट उभारणीसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे.
आरोग्य सेवेसाठी तात्पुरत्या स्वरूपातील दवाखाने सज्ज ठेवण्याचे, पिण्याच्या पाण्याची आणि वीज पुरवठ्याची सोय करण्याचे निर्देश आमदार खताळ यांनी दिले. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता शाम मिसाळ यांच्याकडून त्यांनी पालखी मार्गाच्या कामाची माहिती घेतली. मार्गाच्या कामासाठी मंत्री विखे पाटील यांनी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले आणि उरलेल्या दिवसात साईडपट्ट्यांची कामे पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.

यावेळी आमदार खताळ यांनी संगमनेर तालुक्यात पालखीचे आगमन होणे हा अहमदनगर जिल्ह्यासाठी अभिमानास्पद क्षण असल्याचे म्हटले. त्यामुळे या पालखीचे स्वागत चांगल्या पद्धतीने व्हावे यासाठी ग्रामस्थ आणि प्रशासनाच्या समन्वयातून चांगले नियोजन झाले आहे. पालखीच्या स्वागतासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित राहावे अशी विनंती त्यांनी केली असून, जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ अधिकारी, वारकरी सांप्रदायातील कार्यकर्ते आणि नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहनही त्यांनी केले.
या बैठकीला तहसीलदार धीरज मांजरे, अतिरिक्त गटविकास अधिकारी राजेंद्र ठाकूर, उपकार्यकारी अभियंता शाम मिसाळ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश घोलप, पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे यांच्यासह अनेक ग्रामस्थ आणि अधिकारी उपस्थित होते.


