
संगमनेर, प्रतिनिधी –
संगमनेर शहर आणि तालुक्यात अन्नपदार्थांमधील भेसळीच्या वाढत्या तक्रारींनी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अन्न व औषध प्रशासनाने (FDA) यापूर्वी अनेक ठिकाणी छापे टाकून संशयित नमुने गोळा केले असले, तरी अद्याप ठोस कारवाई झालेली नाही. आता संगमनेरमध्ये गुळात भेसळ झाल्याची गंभीर तक्रार समोर आल्याने, प्रशासन यावर काय पाऊल उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
संगमनेर येथील ‘सिद्धी नैसर्गिक गुळ’ या दुकानाचे विक्रेते आणि निर्माते मोहनलाल बन्सीलाल दर्डा यांच्याविरुद्ध शंकर ढमाले यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाकडे सविस्तर तक्रार दाखल केली आहे. संबंधित व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याची मागणी ढमाले यांनी केली आहे.

रासायनिक भेसळीमुळे त्रास झाल्याचा आरोप ढमाले यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, एका विशिष्ट कंपनीचा गुळ खाल्ल्यानंतर त्यांना तीव्र पोटात वेदना झाल्या आणि त्यांना थेट रुग्णालयात दाखल होऊन उपचार घ्यावे लागले. यापूर्वीही गुळ खाल्ल्यानंतर अशाच प्रकारचा त्रास होऊन रुग्णालयात उपचार घ्यावे लागल्याचे त्यांनी नमूद केले आहे. वैद्यकीय अहवालानुसार, ही अन्नातून विषबाधा झाल्याचा प्रकार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या गुळात कृत्रिम रंग आणि डिटर्जंट पावडरचा वापर केला जात असल्याचा गंभीर आरोप ढमाले यांनी केला आहे. त्यांनी या गुळाचे नमुने स्वतःजवळ ठेवले असून, त्याची तातडीने तपासणी करण्याची मागणी केली आहे.
वाढत्या भेसळीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष? संगमनेर शहर व तालुक्यात अन्नभेसळीचे प्रकार सातत्याने उघडकीस येत आहेत. नामांकित मिठाईची दुकाने, किराणा दुकाने, तसेच तेल, गुळ, खवा यांसारख्या नित्याच्या अन्नपदार्थांमध्ये भेसळ असल्याच्या अनेक तक्रारी यापूर्वीही झाल्या आहेत. एफडीएने संशयित पदार्थांचे नमुने घेतले असले, तरी यावर ठोस कारवाईची प्रतीक्षा कायम आहे. त्यामुळे, नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या भेसळखोरांवर कधी अंकुश लावला जातो, याकडे लक्ष लागले आहे.


