संगमनेर, प्रतिनिधी:
संगमनेर शहरातील म्हाळुंगी नदीवर नव्याने बांधलेल्या पुलाचे श्रेय माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचेच असल्याचा दावा काँग्रेसचे शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे यांनी केला आहे. तसेच, सत्तांतरानंतर सत्ताधाऱ्यांनी केवळ राजकारणासाठी पुलाचे काम रखडवल्याचा आरोप करत त्यांनी पुलाच्या कामाचे श्रेय घेऊ पाहणाऱ्यांना पुन्हा एकदा आरसा दाखवला.

या संदर्भात दिवटे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात पुलाच्या रखडलेल्या कामाचा घटनाक्रम विशद करत म्हटले आहे की, २०२२ मध्ये म्हाळुंगी नदीला आलेल्या पुरामुळे साईनगरकडे जाणारा जुना पूल खचला होता. पूल वाहतुकीला बंद झाल्याने परिसरातील नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून तत्कालीन मंत्री बाळासाहेब थोरात आणि नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांनी तातडीने पाहणी केली होती. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून तात्पुरता पूल उभारण्यात आला. त्यानंतर साईनगर, घोडेकर मळा आणि गंगामाई घाटाकडे जाणारा पूल भक्कम व्हावा यासाठी बाळासाहेब थोरात यांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करून साडेचार कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला होता.
मात्र, राज्यात सत्तांतर झाल्यानंतर पुलाचे काम रखडले. त्यानंतर पालकमंत्री आणि त्यांच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी केवळ राजकारण करण्यासाठी मंजूर झालेला निधी न मिळवता सुरू असलेल्या नगरपालिकेच्या शॉपिंग कॉम्प्लेक्सचा निधी या पुलासाठी वळवला आणि त्यामुळे कामाला विलंब झाला. पुलाच्या बांधणीसाठी शालेय विद्यार्थी, परिसरातील रहिवासी आणि नागरिकांकडून सातत्याने मागणी होत होती, तसेच म्हाळुंगी नदी पूल कृती समितीनेही यासाठी आंदोलन केले होते. तरीही, राजकीय सोयीसाठी हे काम थांबवले गेले, असे दिवटे यांनी म्हटले आहे.

जनतेच्या विकासासाठी राजकारण करायचे असते हा मंत्र लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने जपला आहे, असे दिवटे यांनी अधोरेखित करत थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर शहर हायटेक आणि वैभवशाली बनले. नागरिकांना चांगल्या सुविधा मिळत असून, निळवंडे धरणातून थेट पाईपलाईन योजनेमुळे कडक उन्हाळ्यातही संगमनेरकरांना मुबलक पाणी उपलब्ध होते, असे सांगितले.
संगमनेरमध्ये हायटेक बस स्थानक, नगरपालिका, न्यायालय इमारत, प्रांत कार्यालय, तहसील कार्यालय, पंचायत समिती, शासकीय विश्रामगृह, कवी अनंत फंदी खुले नाट्यगृह यांसारख्या पायाभूत सुविधा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली विकसित करण्यात आल्या आहेत. याशिवाय, प्रवरा नदीवर चार पूल आणि बायपाससारख्या मोठ्या विकास योजनाही राबवण्यात आल्या आहेत. संगमनेर शहर स्वच्छ आणि सुंदर शहर म्हणून ओळखले जाते, यासाठी नगरपालिकेला राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कार मिळाले आहेत. ‘हिरवाईचे सुरक्षित शहर’ म्हणून संगमनेरने राज्यात आपली ओळख निर्माण केली आहे, असेही दिवटे यांनी नमूद केले.
पुलाच्या उभारणीचे श्रेय थोरात यांनाच – साईनगर परिसरातील नागरिक आणि विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी म्हाळुंगी पूल लवकरात लवकर पूर्ण व्हावा यासाठी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने पाठपुरावा सुरूच ठेवला होता. आता पूल सुरू झाल्याने समाधान व्यक्त होत असून, या पूल उभारणीचे सर्व श्रेय माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचेच असल्याचे सोमेश्वर दिवटे यांनी ठामपणे सांगितले.
वस्तुस्थिती माहिती असल्याने नागरिकांनीही या पुलाच्या कामासाठी केलेल्या पाठपुराव्याबद्दल थोरात, आमदार सत्यजित तांबे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांचे आभार मानल्याचे त्यांनी म्हटले आहे.

