
संगमनेर, प्रतिनिधी –
शेकडो वर्षांची गौरवशाली परंपरा लाभलेल्या श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे आज (सोमवारी, १६ जून) अहिल्यानगर जिल्ह्यात भक्तिमय वातावरणात आगमन झाले. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अमृत उद्योग समूहाने वारकऱ्यांसाठी आवश्यक सर्व सोयी-सुविधा पुरविल्या. रिमझिम पाऊस आणि भक्तीमय वातावरणात नाशिक पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे आणि इंद्रजीत थोरात यांच्यासह परिसरातील ग्रामस्थांनी या पालखीचे अभूतपूर्व स्वागत व पूजन केले.

पारेगाव बुद्रुक येथे पंढरपूरकडे निघालेल्या या पालखीमध्ये सुमारे २० हजार वारकरी सहभागी झाले होते. यावेळी डॉ. तांबे आणि थोरात यांनी पालखीचे पूजन केले. या प्रसंगी निवृत्तीनाथ देवस्थानचे अध्यक्ष ॲड. सोमनाथ घोटेकर, अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे, पोलीस निरीक्षक देविदास ढूमने, ॲड. त्र्यंबकराव गडाख, साहेबराव गडाख, दौलत गडाख, सोमनाथ गडाख, सचिन गडाख, बी. आर. चकोर, विजय राहणे आदींसह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
रिमझिम पावसातही वारकरी मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने दिंडीत सहभागी झाले होते. हरिनामाचा गजर करत, टाळ-मृदंगाच्या तालावर अभंग गात, पालखीने नाशिक जिल्ह्याची वेस ओलांडून अहिल्यानगर जिल्ह्यात प्रवेश केला. अश्विनाथ विद्यालयाचे लेझीम पथक, पारंपरिक वाद्ये आणि वेशभूषा करून ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनी पालखीचे उत्साहात स्वागत केले. अनेक वारकऱ्यांनी फुगड्या खेळल्या, डोक्यावर तुळशी वृंदावन घेतले आणि सर्वांसमवेत अभंग गायले. हरिनामाच्या गजराने आणि भक्तिमय वातावरणाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.

“विठ्ठलाची पायी वारी ही महाराष्ट्राची एक महान संस्कृती आहे. यात गरीब-श्रीमंत, लहान-थोर असे सर्वजण कोणताही भेदभाव विसरून एकत्र येतात आणि आनंदाने पांडुरंगाच्या चरणी लीन होतात. ही महाराष्ट्राची मोठी सांस्कृतिक व धार्मिक परंपरा आहे. यावर्षीही राज्यात भरपूर पाऊस पडू दे आणि शेतकरी सुखी होऊ दे, अशी प्रार्थना यावेळी केली.”- इंद्रजीत थोरात.
“संत निवृत्तीनाथ महाराज पालखीला मोठी परंपरा आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. वारकरी संप्रदाय हा हजारो वर्षांपूर्वीचा असून तो सर्वांना सोबत घेऊन जाणारा आहे. जात-पात, धर्म हा कोणताही भेदभाव या संप्रदायात नाही. असा हा सांस्कृतिक सोहळा जगासाठी आदर्शवत आहे.” – डॉ. सुधीर तांबे.
बाळासाहेब थोरात यांच्याकडून वारकऱ्यांसाठी विशेष सुविधा
काँग्रेस नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात हे दरवर्षी अहमदनगर जिल्ह्यात पालखीचे आगमन होताच उपस्थित राहून स्वागत करतात. यंदा ते दिल्लीत असल्याने त्यांनी दूरध्वनीवरून वारकरी व ग्रामस्थांशी संवाद साधला. तसेच, त्यांनी वारकऱ्यांसाठी एसएमबीटी सेवाभावी ट्रस्टच्या माध्यमातून रुग्णवाहिका, आणि अमृत उद्योग समूहातील संस्थांमार्फत राहण्याची सोय, पिण्याच्या पाण्याचा टँकर, दवाखाना, वीज यासह सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना ‘यशोधन’ आणि ‘अमृत उद्योग समूहांना’ दिल्या आहेत. संगमनेर तालुक्यातून दिंडी मार्गस्थ होईपर्यंत सर्व सुविधा पुरविण्यात येणार आहेत.



