
संगमनेर, १७ जून
पावसाळ्याला सुरुवात होताच संगमनेर विद्युत महामंडळाचा (महावितरण) गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे. शहरातील अनेक उपनगरे आणि गावठाण भागांत विजेचा लपंडाव सुरू असून, यामुळे नागरिक आणि विशेषतः छोटे व्यावसायिक मेटाकुटीला आले आहेत. शिवसेना शहरप्रमुख रवींद्र उर्फ पप्पू कानकाटे यांनी महावितरणच्या या निष्क्रियतेवर तीव्र संताप व्यक्त करत, अधिकाऱ्यांना गंभीर परिणामांचा इशारा दिला आहे.
कानकाटे यांनी आरोप केला आहे की, वादळ, वाऱ्यामुळे झाडे पडून किंवा तारा तुटून वीजपुरवठा खंडित होणे नागरिकांना समजण्यासारखे आहे. मात्र, दर शनिवारी शहरातील जवळपास ७०-७५ टक्के भागात दिवसभर वीज गायब असते. रविवारी कोणतेही कारण नसतानाही विजेचा ये-जा करण्याचा खेळ सुरू होता. महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या या हलगर्जीपणामुळे अनेक छोटे व्यावसायिक, ज्यांचे व्यवसाय पूर्णपणे विजेवर अवलंबून आहेत, त्यांचे मोठे नुकसान होत आहे. यात सलून व्यावसायिक, पिठाच्या गिरणीचे दुकानदार, आईस्क्रीम पार्लरधारक अशा सुमारे ७५ टक्के व्यावसायिकांना विजेअभावी आपला व्यवसाय चालवता येत नाही.
महावितरणने नागरिकांसाठी दिलेला संपर्क क्रमांक (०२४२५-२२५९२५) अनेकदा अनुपलब्ध असतो किंवा तिथे योग्य कर्मचारी नसतात. यामुळे नागरिक आपली तक्रार नोंदवू शकत नाहीत आणि त्यांची अडचण कुणी ऐकून घेत नाही.
कानकाटे यांनी महावितरणवर दुहेरी धोरणाचाही आरोप केला आहे. महावितरण गरीब ग्राहकांच्या अडचणी ऐकून न घेता त्वरित वीजपुरवठा खंडित करते, तर दुसरीकडे धनदांडग्यांकडून ‘चिरीमिरी’ घेऊन त्यांना सूट दिली जाते. हे पक्षपाती धोरण त्वरित बंद करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. याशिवाय, शहरातील विद्युत खांबांवर अनेक अनावश्यक तारा आणि वायरींचा मोठा गोंधळ वाढला आहे, ज्यामुळे शहराचे विद्रूपीकरण झाले आहे. याकडेही महावितरणचे पूर्णपणे दुर्लक्ष असल्याचे कानकाटे यांनी म्हटले असून, हा गोंधळ कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
कानकाटे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दात इशारा दिला आहे की, जर विजेचा लपंडाव थांबला नाही आणि संपर्क क्रमांकावर योग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून प्रत्येक तक्रार नोंदवून घेतली नाही, तर संगमनेर शहर शिवसेनेच्या वतीने महावितरणच्या कार्यालयाला होणाऱ्या कोणत्याही नुकसानीस संबंधित अधिकारी स्वतः जबाबदार असतील. शिवसेनेने या गंभीर समस्येकडे महावितरणचे लक्ष वेधले असून, यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. अन्यथा, शिवसेना तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा कानकाटे यांनी दिला आहे. 


