संगमनेर, प्रतिनिधी-
महाराष्ट्राला लाभलेल्या समृद्ध परंपरेचा भाग असलेल्या पायी दिंडी सोहळ्यातील संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे संगमनेर तालुक्यात सोमवारी आगमन झाले आहे. या निमित्ताने माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या सूचनेनुसार वारकऱ्यांसाठी पिण्याचे पाणी, आरोग्य सेवा आणि इतर विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, यामुळे वारकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पालखी अहिल्यानगर जिल्ह्यात दाखल झाल्यानंतर माजी आमदार डॉ. सुधीर तांबे आणि इंद्रजीत थोरात यांनी तिचे स्वागत केले. यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पालखीचे अध्यक्ष ॲड. सोमनाथ घोटेकर यांच्यासह गावकरी आणि वारकऱ्यांशी संवाद साधला.
वारकऱ्यांच्या सेवेसाठी एसएमबीटी सेवाभावी संस्थेच्यावतीने दोन रुग्णवाहिका, २५ डॉक्टरांचे पथक आणि परिचारिकांसह आरोग्य सेवा पुरवण्यात आली आहे. प्रत्येक गावात पिण्याच्या पाण्याचे टँकर, वारकऱ्यांसाठी चहा, नाष्टा आणि निवासाची सोय अशा अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. इंद्रजीत थोरात यांच्या नेतृत्वाखाली अमृत उद्योग समूहाच्यावतीने आणि विविध सहकारी संस्थांनी दरवर्षीप्रमाणे ही सेवा दिली आहे. पहिल्याच दिवशी ११८९ वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. दिंडीमध्ये सहभागी होणारे वारकरी दरवर्षी संगमनेर तालुक्यात आल्यावर त्यांची अत्यंत चांगली सोय केली जाते, यामुळे वारकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असते.
अमृत उद्योग समूह आणि यशोधन कार्यालयाच्या वतीने पुरवण्यात आलेल्या विविध सुविधांबद्दल सुमारे २५,००० वारकऱ्यांनी समाधान आणि आनंद व्यक्त केला. हरिनामाच्या गजरात हे वारकरी आता पंढरपूरकडे मार्गस्थ होत आहेत.

दिंडीचे प्रमुख ॲड. सोमनाथ घोटेकर म्हणाले की, संत निवृत्तीनाथ महाराज पालखीला मोठे ऐतिहासिक महत्त्व आहे. या पालखीचे दरवर्षी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये चांगले स्वागत होते. ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे वारकरी संप्रदायाचे पाईक असून, त्यांनी कायमच वारकऱ्यांची काळजी घेतली आहे आणि त्यांना चांगल्या सुविधा पुरवल्या आहेत.
ॲड. त्रिंबक गडाख यांनी सांगितले की, इंद्रजीत थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली वारकऱ्यांना चांगल्या सुविधा देण्यासाठी सर्व पाहणी करण्यात आली आणि आवश्यक त्या बाबी पुरवण्यात आल्या. वारकरी हे अतिथी असून, त्यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्याची परंपरा संगमनेर तालुक्याने कायम जपली आहे, असेही ते म्हणाले.
कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची मोठी परंपरा असून, वारीमध्ये लहान-मोठा, जात-धर्म असा कोणताही भेदभाव नसतो. सर्वजण एकरूप होऊन पांडुरंगाच्या चरणी लीन होतात आणि ‘माऊली’ म्हणून एकमेकांचा आदर करतात. या वारकऱ्यांची आरोग्य सेवा करणे हा मोठा आनंद आहे.


