संगमनेर, प्रतिनिधी:
एकेकाळी ‘स्वच्छ आणि सुंदर शहर’ म्हणून राज्य व देशपातळीवर नावलौकिक मिळवलेल्या संगमनेर शहरावर सध्या अस्वच्छतेचे मोठे सावट पसरले आहे. शहरातील वाढलेल्या दुर्गंधी, कचऱ्याचे ढीग आणि रोगराईच्या धोक्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी शुक्रवारी, (२७ जून) माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर नगर परिषदेवर जोरदार ‘एल्गार’ मोर्चा काढला. प्रशासनाच्या उदासीन आणि मनमानी कारभारावर नागरिकांनी यावेळी तीव्र संताप व्यक्त केला.

गेल्या काही वर्षांपासून संगमनेर शहराने स्वच्छतेच्या बाबतीत अनेक राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय पारितोषिके मिळवून एक आदर्श निर्माण केला होता. तत्कालीन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली आणि दुर्गाताई तांबे यांच्या कार्यकाळात ‘स्वच्छ शहर, सुंदर शहर’ ही संकल्पना अत्यंत प्रभावीपणे राबवण्यात आली होती. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून प्रशासकीय अनास्थेमुळे शहराची ही ओळख पुसली जात असल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे.
या मोर्चादरम्यान प्रशासनाला दिलेल्या निवेदनात नागरिकांनी अनेक गंभीर समस्यांकडे लक्ष वेधले आहे. शहरात गाई, कुत्री आणि डुकरे मोकाट फिरत असून त्यामुळे अपघात व अस्वच्छता वाढली आहे. कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन होत नाही, ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले असून ते वेळेवर उचलले जात नाहीत आणि घंटागाडी देखील वेळेवर येत नाही. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता निर्माण झाली असून डासांचे प्रमाण खूप वाढले आहे. यामुळे डेंग्यू, मलेरियासारख्या साथीच्या आजारांचा मोठा धोका निर्माण झाला आहे. याशिवाय, कचरा डेपोचा अक्षरशः डोंगर झाला असून म्हाळुंगी नदीच्या काठावरही अस्वच्छतेचा कहर पाहायला मिळतो.

या मोर्चात माजी नगराध्यक्ष विश्वास मुर्तडक, शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, नितीन अभंग, गणेश मादास, प्रमिला अभंग, ॲड. प्रमोद कडलग, निखिल पापडेजा, मुस्ताक शेख, वैष्णव मुर्तडक, मनोज यंगदाल, राजेंद्र वाकचौरे, मिलिंद औटी, सुरेश झावरे, लक्ष्मण बर्गे, वैशाली बर्गे, सुविधा आरसिद्ध, अनिता साळवे, अंबादास आडेप, योगेश जाजू, सुभाष दिघे, स्वप्निल गुंजाळ, मिश्रा भाभी, सचिन खाडे, किशोर बोराडे, प्रमोद गणोरे, सचिन वामन, नूर मोहम्मद खान, डॉ. दानिश पठाण, सागर कानकाटे, अक्षय गुंजाळ, विजय पांढरे, शैलेश कलंत्री, गजेंद्र अभंग, सौदामिनी कान्होरे, सुनीता कांदळकर, विशाल वैराळ आदींसह विविध प्रभागांतील शेकडो नागरिक आणि पदाधिकारी सहभागी झाले होते.
पालिकेचे मुख्याधिकारी बाहेरगावी असल्याने निवेदन डेप्युटी मुख्याधिकारी संजय टेकाळे, प्रशांत जुन्नरे, राजेंद्र गुंजाळ आणि अमजद शेख यांनी स्वीकारले. नागरिकांनी यावेळी प्रशासनाविरोधात प्रचंड संताप व्यक्त केला, यामुळे शहरातील स्वच्छतेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.
यावेळी बोलताना दुर्गाताई तांबे यांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. त्या म्हणाल्या की, स्वच्छतेसाठी मिळालेल्या सुमारे १० कोटींच्या पारितोषिकांमुळे शहरात रस्ते, उद्याने आणि इतर विकासकामे करणे शक्य झाले. मात्र, आता स्वच्छतेची सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. शहरातील आरोग्यव्यवस्था धोक्यात आली असून, उंदीर, घुशी आणि डासांचा त्रास वाढला आहे. प्रशासनाचे याकडे कोणतेही लक्ष नाही. प्रशासनाने तातडीने स्वच्छतेकडे लक्ष देऊन उपाययोजना कराव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.



